नवी दिल्ली -कॉंग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराचा प्रारंभ उद्यापासून (शुक्रवार) राजस्थानच्या उदयपूरमध्ये होणार आहे. पक्षाची कालबद्ध फेररचना आणि आगामी निवडणुकांसाठीची सज्जता आदींच्या दृष्टीने त्या शिबिराला महत्व आहे.
विविध निवडणुकांमध्ये कॉंग्रेसच्या पीछेहाटीचे सत्र कायम आहे. त्यापार्श्वभूमीवर, पक्ष संघटनेत पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशातून चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये पक्षाचे सुमारे 430 प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. शिबिराचा प्रारंभ पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भाषणाने होईल. तर, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणाने 15 मे यादिवशी शिबिराचा समारोप होईल. पक्षाच्या पुढील वाटचालीची नवी रूपरेषा ठरवण्यासाठी शिबिरातील चर्चा उपयुक्त ठरणार आहे.
चिंतन शिबिरातील चर्चेसाठी कॉंग्रेसने सहा विषय निवडून तितक्याच गटांची स्थापना केली आहे. ते विषय राजकीय, सामाजिक न्याय, अर्थव्यवस्था, पक्ष संघटना, युवक आणि शेतकरी-शेतमजुरांशी निगडीत आहेत. शिबिराला उपस्थित राहणाऱ्या नेत्यांना संबंधित गटांमध्ये विभागून व्यापक चर्चा केली जाईल. संबंधित गट पुढील कृतीसाठी प्राथमिक अहवाल सादर करतील.
अर्थव्यवस्थेची घसरण, संपत्तीविषयक असमानता, महागाई, बेरोजगारी, शेतकरी समस्या, धार्मिक विभाजन, चीनी कुरापती आदी मुद्द्यांवरही कॉंग्रेसच्या शिबिरात चर्चा होणार आहे. शिबिराच्या अखेरच्या दिवशी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होईल. त्या बैठकीत विविध ठराव मंजूर होण्याची शक्यता आहे.