नवी दिल्ली – मणिपुर मधील हिंसाचार सुरू होऊन चार महिने होऊन गेल्यानंतरही तेथील स्थिती नीट हाताळण्यात अपयश आल्याबद्दल कॉंग्रेसने केंद्रावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारकडून जो खोटारडेपणा झाला आहे तो केंद्र सरकार विसरले आहे अशी टीकाहीं कॉंग्रेसने केली आहे.
कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, गेल्या चार महिन्यांत जगाने पाहिले आहे की, मणीपूरच्या सर्वात भीषण संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे अपयशी ठरले आहेत. एका सोशल मिडीया पोस्ट मध्ये रमेश यांनी आरोप केला आहे की “पंतप्रधान आणि त्यांच्या ढोल-ताशांना जी 20 चे वेड लागलेले असताना, 3 मे रोजी जातीय हिंसाचार सुरू झाल्यानंतर चार महिन्यांत मणिपुरात सरकारकडून झालेला खोटारडेपणा सरकार विसरले आहे.
मणिपुरातील समाज पुर्वीपेक्षा अधिक विभाजीत कसा होईल हेच तेथील मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी पाहिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हिंसाचाराचा अंत करण्यात आणि शस्त्रास्त्रे तसेच दारूगोळा जप्त करण्यात अपयशी ठरले आहेत. उलट मणिपुरात आता अनेक सशस्त्र गट एकमेकांच्या विरोधातील संघर्षात उतरले आहेत.
पंतप्रधान मणिपूरला भेट देण्यास किंवा सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यास किंवा कोणतीही विश्वासार्ह शांतता प्रक्रिया सुरू करण्यास नकार देतात, असे ते म्हणाले.पंतप्रधान या प्रकरणी मंत्रिमंडळातील मणिपूरमधील आपल्या सहकाऱ्यालातरी भेटले आहेत का, असा सवाल कॉंग्रेस सरचिटणीसांनी केला.
मणिपूर सरकारने इम्फाळच्या न्यू लॅम्बुलेन भागातील 24 सदस्य असलेल्या 10 कुकी कुटुंबांपैकी शेवटचे कुटुंबही स्थलांतरित झाले आहे, ते अनेक दशकांपासून तेथे राहत होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या कुटुंबांना शनिवारी पहाटे इंफाळ खोऱ्याच्या उत्तरेकडील कुकी-बहुल कांगपोकपी जिल्ह्यात नेण्यात आले. त्यांचे सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतरीत करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. तथापि या लोकांना जबरदस्तीने तेथून स्थलांतरीत होण्यास भाग पाडले गेले आहे असे संबंधीत कुकी कुटुंबियांनी म्हटले आहे.