पणजी -कॉंग्रेसने गोवा विधानसभेसाठी पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित केला. त्यात गोव्यातील खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याची ग्वाही देण्यात आली आहे. यावेळी बोलताना पक्षाचे गोवा शाखेचे निरीक्षक पी चिदंबरम म्हणाले की, गोव्यात निधीची उपलब्धता ही समस्याच नाही, तर निधीचे वितरण हीच मुख्य समस्या आहे.
गोव्याचा स्वत:चा महसूल, केंद्र सरकारकडून मिळणारा महसुलाचा वाटा आणि केंद्र सरकारी अनुदान हे तीन मुख्य आर्थिक स्रोत या राज्यात आहेत.
या निधीचा योग्य विनियोग करून हुशारीने त्याचा वापर केला तर आमच्या जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण होऊ शकतात. गोव्याला आयटी आणि औषध निर्मितीचे हब केले गेल्यास गोव्याचे उत्पन्न अनेक पटींनी वाढू शकते. पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना चिदंबरम म्हणाले की, पक्षांतर करणारे आमदार ही गोव्यातील एक मोठी समस्या आहे. पण जर जनतेनेच या पक्षांतर करणाऱ्या आमदारांना धडा शिकवला तर ही समस्या दूूर होऊ शकते.
दरम्यान, गोव्यात कॉंग्रेस सत्तेवर आल्यास येथे न्याय योजना राबवली जाईल आणि राज्यातील गरिबातील गरिबांना दर महिन्याला 6 हजार रुपयांची मदत थेट स्वरूपात पोहोचवली जाईल, अशी ग्वाही पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी गोव्यातील प्रचार सभेत या आधीच दिली आहे.