मुंबई – प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीभोवती असलेले अनधिकृत बांधकाम हटवण्यास आज पहाटे पासून सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आला. तसेच प्रतापगडाच्या पायथ्याला कलम १४४ लागू करून कोणालाही त्या ठिकाणी जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. यावरुन आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहे.
अशातच काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’अफझलखानाला हिरो बनवण्याचा प्रयत्न भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्ष करत असतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे.’
ते पुढे म्हणाले,’अफझलखानाचं नाव घेत धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांचं लक्ष मुलभूत समस्यांपासून भरकटवण्यासाठी या कुरापती करण्यात येत आहेत.’ असा आरोप वाघमारे यांनी केला आहे.
दरम्यान, या कबरनजिक असलेले अतिक्रम पाडण्यासाठी बुधवारी रात्रीच तयारी सुरु करण्यात आली होती. शिवप्रताप दिनी अनेक शिवभक्त यावेळी महाबळेश्वर परिसरात जमा झाले होते. परंतु १४४ लागू असल्यामुळे कोणालाही किल्ल्याच्या पायथ्यशी जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. १५०० हुन अधिक पोलीस या ठिकाणी दाखल झाल्याचे समजते. तसेच सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अनधिकृत गोष्टी हटवण्यास सुरुवात झाल्याचे समजते.
महाबळेश्वर,वाई,कराड,सातारा तसेच प्रतापगड परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी माध्यम प्रतिनिधींना देखील याठिकाणी जाण्यास परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते. गेल्या काही वर्षांमध्ये अफझल खानाच्या कबरीशेजारी बांधकाम करून उत्तातिकरण करण्याच्या प्रकाराला सुरुवात झाली होती. न्यायालयाने देखील हे बांधकाम हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाने त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केल्याचे दिसून आले.