मुंबई – मेट्रोसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने देखील कांजूरमार्गच्या जागेचा विचार केला होता. तरीही मेट्रो कारशेडच्या जागेबाबत केंद्र सरकारने राज्याला पत्र पाठवण्यामागे हीन राजकारण आहे, असा आरोप कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
22 सप्टेंबर 2015 रोजी अश्विनी भिडे यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले होते. मेट्रो 3 साठी ही जमीन उपयुक्त आहे, त्याशिवाय प्रकल्पाची अंमलबजावणी अशक्य आहे. इतकंच नाही तर 20 एप्रिल 2019 मध्ये प्रवीण दराडे यांनी देखील मेट्रो 6 च्या कास्टिंग यार्डसाठी कांजूरमार्गच्या जागेसाठी पत्र लिहिले होते, असा दावा सावंत यांनी केला आहे.
मुंबई मेट्रो प्रकल्प मुंबईकरांसाठी महत्वाचा प्रकल्प आहे. मेट्रो कारशेडच्या जागेबाबत केंद्र सरकारने राज्याला पत्र पाठवण्यामागे हीन राजकारण आहे. त्या जागेवर 1969 पासून राज्य सरकारचा अधिकार आहे.
मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच केंद्र सरकार आता या जागेवर दावा सांगत आहे. फडणवीस सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला आहे. कोणताही अधिकार नसताना दोन अडीच वर्षांनी केंद्राला कशी जाग आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.