नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरुन ६३ लोकांना अनफॉलो केले आहे. यामध्ये पत्रकार, नेत्यांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या स्टाफ मधील काही लोकांना सुद्धा राहूल यांनी अनफॉलो केले आहे. यासंदर्भात राहुल यांनी स्वत: आढावा घेतल्यानंतर पाठपुरावा करुन या लोकांना अलफॉलो करण्याचा निर्णय घेतला आहे. ही यादी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी याआधी देशातील विविध क्षेत्रातील २८२ लोकांना ट्विटरवर फॉलो करत होते. मात्र गेल्या दोन दिवसांनंतर ही संख्या २१९ वर आली आहे. आपल्या स्टाफ मधील लोकांना अनफॉलो करताना राहुल यांनी सांगितले की, हे लोक त्यांच्याबरोबरच काम करत आहेत. त्यामुळे राहूल यांनी त्यांच्या आसपास असणारे कौशल विद्यार्थी, निखिल अल्वा आणि अलंकार यांना सर्वप्रथम अनफॉलो केले आहे. आपल्याच स्टाफ मधील लोकांना का फॉलो करायचे असा तर्क यामागे देण्यात आला आहे.
या ६३ लोकांच्या यादीमध्ये कॉंग्रेस मधून शिवसेनेत जाणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांचा सुद्धा समावेश आहे. मोदी सरकारची खिल्ली उडविणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या नावाचाही यात समावेश आहे. वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि काही अन्य् पत्रकारांबरोबर कॉंग्रेसच्या बातम्या कव्हर करणाऱ्या पत्रकारांना सुद्धा अनफॉलो करण्यात आले आहे.
राहुल यांचे ट्विटर अकाउंट बघणाऱ्या स्टाफकडून काही लोकांना फॉलो केल्या गेले होते. त्यामुळे अशा लोकांना आता अनफॉलो करण्यात आले असल्याचे कारण सांगितल्या जात आहे. दरम्यान राहुल आता त्यांचे ट्विटर अकाउंट स्वत: बघत असून यामध्ये आणखी काही जणांना अनफॉलो करण्यात येऊ शकते तर काही नवीन लोकांना फॉलो सुद्धा केले जाऊ शकते.