पुणे -“देव तारी त्याला कोण मारी’ असे म्हटले जाते. पण रेल्वेची धडक बसल्यानंतरही एक महिला बालंबाल बचावली. यावेळ देवदूत बनून तिला वाचवण्यासाठी निमित्त ठरले ते लोहमार्ग पोलीस. रेल्वेमार्ग ओलांडताना जखमी झालेल्या या महिलेला तब्बल चार किलोमीटर झोळीतून नेत रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे तिचे प्राण वाचले.
आशा दाजी वाघामारे (वय 42, रा. थेरगाव, फनसावाडी, कार्ला) असे या महिलेचे नाव असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आशा वाघमारे या सोमवारी (दि. 31) सकाळी अकराच्या सुमारास जांबरुग गावाजवळ रेल्वे पटरी ओलांडत होत्या. त्यावेळी धावत्या रेल्वेचा त्यांना धक्का बसला. त्यामुळे त्या उडून बाजूला पडल्या. त्यांच्या मणक्यालाच दुखापत झाल्याने त्यांना चालता येत नव्हते. त्यात हा भागही दुर्गम.
लोणावळा रेल्वे स्थानकाच्या प्रमुखांना याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने लोणावळा दूरक्षेत्र लोहमार्गाला याची माहिती दिली. पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक गोसावी व त्यांच्या पथकाला तत्काळ जखमी महिलेला मदत करण्यास सांगितले.
त्यानुसार पोलीस कर्मचारी आणि चार हमालांचे एक पथक कर्जत रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या एका मालगाडीत बसून रवाना झाले. मदतीसाठी कर्जत लोहमार्ग ठाण्याचे काही कर्मचारीही यावेळी आले होते. महिला पडलेला भाग दुर्गम असल्यामुळे तेथे रुग्णवाहिका येऊ शकत नव्हती. अखेर पोलिसांनीच कपड्यांची झोळी करून महिलेला त्यातून नेण्याची तयारी केली.
घटनास्थळापासून तब्बल चार किलोमीटर चालत पळसदरी रेल्वेस्टेशन गाठले. तेथे आलेल्या रुग्णवाहिकेतून या महिलेला कर्जत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्यांच्या दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्यामुळे त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्या धोक्याच्या बाहेर आल्या. हा अपघात होता की घातपात याची माहिती पोलिसांना मिळेना! अखेर रेल्वे पटरी ओलांडत असताना, दुसऱ्या गाडीची धडक लागून आपण खाली पडल्याचे आशा यांनी स सांगितल्याने या संशयावर पडदा पडला. त्यांच्याकडून मिळालेल्या घरचा पत्त्यावर त्यांच्या अपघाताची माहिती देण्यात आली. अशा यांचा मुलगा नाना दाजी वाघमारे (वय.22) हा ससून रुग्णालयात आला.
त्याने पोलिसांच्या या माणुसकी वागणुकीचा डोळ्यात पाणी आणून कौतुक केले. ते होते म्हणून म्हणून माझ आई वाचली,अशी कृतज्ञता व्यक्त केली. मानवतेचे हे कार्य पोलीस अधीक्षक वासये-पाटील, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.आर. गौड, पोलीस उपनिरीक्षक गोसावी, कर्मचारी जाधव, गांगुर्डे, गायकवाड यांच्या पथकाने केली.