नवी दिल्ली : निवडणूक रोखे प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडावे, अशी मागणी करत कॉंग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या आवारात जोरदार निदर्शने केली.
संसदेच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ केलेल्या या आंदोलनात शशी थरूर, कार्ती चिदंबरम आणि मनिष तिवारी आदी नेते सहभागी झाले होते. निवडणूक रोख्यांना निवडणूक आयोग आणि रिझर्व्ह बॅंकेचा विरोध होता. तो डावलून मोदी सरकारने ती योजना राबवल्याचे स्पष्ट झाल्याने त्या विरोधात कॉंग्रेसने आवाज उठवला आहे.
लोकसभेत प्रदुषणाबाबत चर्चा
भारत सरकारचे पर्यावरणाबातचे धोरण हे झटके आल्यासारखे आहे. आता आम्ही याबाबत गंभीर होतो आणि काही दिवसांनी आम्ही ही बाब विसरून जातो, अशी टीका कॉंग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी यांनी केली. परदेशात पर्यावरणाची समस्या सोडवण्यासाठी विविध उपाय त्यांच्या पध्दतीने हाताळण्यात येतात. मात्र आमच्याकडे यासाठी कोणतेही दीर्घकालीन धोरण आखलेले दिसत नाही, असे ते म्हणाले.
राज्यसभेत जेएनयुवरून गदारोळ
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर केलेला लाठीमार आणि दिल्लीतील प्रदुषित पाण्याच्या मुद्द्यावरून राज्यसभेत सभासदांनी गदारोळ केला. त्यावेळी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभासदांना नियमांची आठवण देत शांत राहण्याचा सल्ला दिला. संसदेवर मोर्चा आणणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी झोडपून काढणे हे निंदाजनक आहे. भाषण स्वातंत्र्य आहे की नाही. जेएनयुच्या विद्यार्थ्यांना नागरी स्वातंत्र्य का नाकारले जात आहे, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे के. के. रंगेश म्हणाले.
त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी जेएनयुच्या आवारातील विवेकानंद यांच्या प्रतिमेच्या विटंबनेवर भाष्य केले. त्यानंतर वादाला तोंड फुटले. गदारोळाला सुरवात झाली. या गदारोळातच भाजपाच्या विजय गोयल यांनी प्रदुषणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर पुन्हा गोंधळाला सुरवात झाली.