गुवाहाटी – अप्पर आसाम मध्ये पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीतील सर्व जागी भाजप जिंकणार असल्याची पेड न्युज देऊन लोकांमध्ये भ्रम निर्माण केल्याच्या कारणावरून कॉंग्रसने भाजपचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा, प्रदेश भाजप अध्यक्ष रणजीतकुमार साद आणि आठ वृत्तपत्रांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. रविवारी रात्री दिसपुर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडेही या बाबत तक्रार देण्यात आली आहे.
भाजपकडून करण्यात आलेला हा प्रकार म्हणजे निवडणूक प्रक्रिया सुरू असताना लोकांमध्ये घटनाबाह्यपणे प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे असेही कॉंग्रेसने म्हटले आहे. आसाम मध्ये अजून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान बाकी असताना तेथील मतदारांवर अशा प्रकारची खोटी जाहीरात बातमीच्या स्वरूपात प्रसिद्ध करून निवडणूक आचार संहितेचा भंग करण्यात आला आहे असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. आठ वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ही जाहींरात बातमीच्या स्वरूपात छापून आली असून त्यात पहिल्या टप्प्यातील सर्व जागा भाजप जिंकणार असे नमूद करण्यात आले आहे. त्या वृत्तपत्रांनाही यात आरोपी करण्यात आले आहे. आसामातील पहिल्या टप्प्यात 39 जागांवर मतदान झाले आहे.