मुंबई, दि. 29 – राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची तयारी राज्य सरकारने केल्याचे सांगितले जात आहे. राज्यात सातत्याने वाढणारे करोना रुग्ण आणि मृतांचा आकडा या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, या मुद्द्यावरून आता उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परखड बोल सुनावले आहेत.
“उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचे होते, असे ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केले आहे. तसेच विरोधकांकडून देखील राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याला विरोध केला आहे.
आपल्या ट्वीटमधून आनंद महिंद्रा यांनी उद्धव ठाकरेंना सल्ला देखील दिला आहे. “उद्धवजी, समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब, स्थलांतरीत मजूर आणि छोट्या उद्योजकांचे होते. मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात, असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.