मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरील कारवाई बाबत तुम्ही सॉफ्ट भूमिका घेत आहात काय असा प्रश्न आज पत्रकारांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारला असता ते म्हणाले की सॉफ्ट आणि हार्ड भूमिका म्हणजे काय हेच मला कळत नाही. माझ्यापुढे जी कागदपत्रे येतात त्या आधारे मी निर्णय घेत असतो.
कोणत्याही प्रकरणात कारवाई करायची तर ती न्यायालयात टिकली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे कोणाच्याही बाबतीत आम्ही सॉफ्ट भूमिका घेत नाही. जेथे काहीं चुकीचे घडले आहे त्यावर कारवाई निश्चीतपणे केली जाते असे प्रतिपादनही वळसे पाटील यांनी केले आहे.
राज्यातील गृहमंत्रालय हे भाजपच्या बाबतीत अत्यंत ढिसाळ आणि मवाळ भूमिका घेत आहे अशी तक्रार शिवसेनेच्या गोटातून केली जात आहे. तशातच मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना चर्चेसाठी बोलावून घेतल्याने आज दिवसभर गृहमंत्री हे चर्चेचा केंद्र बिंदू ठरले होते. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर पत्रकारांनी त्यांना गाठून यावर बोलते करण्याचा प्रयत्न केला त्यावर त्यांनी वरील प्रतिपादन केले.
गृहखात्याने आणखी कणखर भूमिका घ्यायला हवी असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली होती. त्यावर भाष्य करताना दिलीप वळसेपाटील म्हणाले की, संजय राऊत यांची भूमिका मी समजू शकतो. आमच्या कामकाजात काही त्रुटी असतील तर त्या आम्ही दूर करू.
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत गृहखात्याच्या कारभारावर चर्चा झाली नाही असे स्पष्टीकरणही वळसेपाटील यांनी दिले. पोलिस आणि गृहखात्याला कायद्याला धरूनच कारवाई करावी लागते. प्रत्येक प्रकरणात गृहमंत्री म्हणून मी आदेश देत नसतो. काही प्रकरणांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांच्या पातळीवरच निर्णय होतो असे ते म्हणाले.