पुणे – तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील सर्व परीक्षा केंद्रावर सोमवारी तीन सत्रातील परीक्षा नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने सुरू करण्याची वेळ आली. परीक्षेसाठी वेळ वाढवून दिली असली तरी परीक्षार्थींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. एका नव्हे, तर सर्वच केंद्रावर सर्व्हर डाउनमुळे तलाठी भरती परीक्षेचा सावळागोंधळ समोर आला आहे.
राज्यात दि. 17 ऑगस्टपासून तलाठी परीक्षा सुरू आहेत. टीसीएस कंपनीमार्फत या परीक्षा घेण्यात येत आहे. सोमवारी राज्यातील 30 जिल्ह्यांमधील 115 टीसीएस केंद्रावरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. वेळापत्रकानुसार सकाळी पहिले सत्र 9 ते 11 या दरम्यान नियोजित करण्यात आले होते. मात्र टीसीएस कंपनीच्या डेटा सेंटर सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झालेने सकाळचे पहिले सत्र वेळेनुसार सुरू करण्यास अडचण निर्माण झाली. यासंदर्भात टीसीएस कंपनीकडून राज्य समन्वय कार्यालयास परीक्षा उशिरा सुरू होण्याबाबत कळविले.
टीसीएस कंपनी व त्यांचे डेटा सेंटर यांनी सर्व देशभरातील परीक्षेसंदर्भातील हा तांत्रिक बिघाड झाला असल्याने वरिष्ठ तंत्रज्ञ स्तरावर युद्धपातळीवर हा तांत्रिक बिघाड शोधून परीक्षा 11 वाजता सर्व केंद्रांवर सुरू करण्यात आली, अशी माहिती भूमि अभिलेख विभागाचे अपर आयुक्त आनंद रायते यांनी दिली.
भूमि अभिलेख विभागाकडून सर्व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करुन प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांना नियोजित परीक्षा उशिरा सुरू होईल असे कळविण्यात आले. त्याप्रमाणे सर्व उमेदवारांना तशी सूचना देण्यात आली. टीसीएस कंपनीकडून तांत्रिक बिघाड दूर करण्यात येऊन राज्यातील सर्व 115 केंद्रावर परीक्षा 11 वाजता सुरू करण्यात आली. सर्व उमेदवारांना नियोजित दोन तासांचा वेळ परीक्षेसाठी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग परिक्षार्थींना आजच्या सत्र-2 मध्ये अतिरिक्त वेळ देण्यात आला, असल्याचे रायते यांनी सांगितले.
“राज्यात सुरू असलेल्या तलाठी भरती परीक्षेपासून कोणताही परिक्षार्थी वंचित राहणार नाही. परीक्षार्थींना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच यापुढील सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच सुरळीत पार पडतील. तसेच टीसीएस कंपनीच्या सर्व्हर डाउन घटनेची चौकशी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यामार्फत करण्यात येईल.” – राधाकृष्ण विखे -पाटील, महसूल मंत्री
वर्ध्यात काही उमेदवार परीक्षेपासून वंचित
वर्ध्यात सर्व्हर डाउननंतर दुसऱ्या परीक्षेच्या निश्चित वेळेचा उल्लेख नोटीसमध्ये नसल्याने गोंधळ उडाला. दुसऱ्या शिफ्टमधील तलाठी परीक्षेचा पेपर उशिरा सुरू झाला. परीक्षा दोन तास उशिरा सुरू होणार असल्याच्या सूचना देणारी नोटीस भिंतीवर लावण्यात आली होती. दोन तास उशिरा पेपर होणार असल्याने परीक्षार्थी केंद्राच्या बाहेर पडले.
पण, सूचनेत दिलेल्या वेळेआधीच परीक्षा सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. वर्ध्याच्या अग्निहोत्री महाविद्यालय परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. तब्बल 10 ते 15 परीक्षार्थी दुसऱ्या शिफ्टमधील परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. या परीक्षार्थींना पुन्हा संधी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.