मुंबई – महसूल विभागांतर्गत होत असलेल्या गट क संवर्गातील 4 हजार 633 तलाठी पदांच्या भरतीसाठी 17 ऑगस्टपासून तीन टप्प्यात परिक्षा होणार आहे. यासाठी परीक्षार्थींना देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावरून गोंधळ झाल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद आणि नांदेडमधील काही विद्यार्थ्यांना थेट नागपूर, अमरावतीचे परीक्षा केंद्र दिल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून केंद्र बदलून देण्याची मागणी होत आहे.
राज्य सरकारकडून तलाठ्यांच्या जागा भरण्यासाठी मेगा भरती घेण्यात येत आहे. मात्र, जादा परीक्षा शुल्क आकारण्यात येत असल्याने आधीच विद्यार्थ्यांनी याला विरोध केला होता. त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेण्याची यंत्रणा संबंधित यंत्रणेकडे उपलब्ध नसल्याचाही आरोप होत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा तलाठी भरती परीक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.
तलाठी भरतीचा पहिला टप्पा 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे. अर्ज करताना तीन केंद्र निवडण्याची संधी होती. परंतु, निवड केलेले परीक्षा केंद्रच दिले गेले नाही. औरंगाबाद आणि नांदेड या दोन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चक्क नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्यामुळे हे केंद्र बदलून देण्याची किंवा एसटीचा खर्च देण्याची मागणी केली जात आहे.
परीक्षेत गैरप्रकार होण्याची शक्यता?
राज्यभरात होत असलेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेत गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याचा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय संमतीने केला आहे. तर, काही विध्यार्थ्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली आहे. महाराष्ट्रात नोकरभरती घोटाळे सुरू असून, वन विभाग, मुंबई पोलीस भरती ई. पेपर फुटलेले आहेत. तलाठीची परीक्षा समोरच असून, पेपरफोड्या थांबविण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर पेपरफुटी कायदा करावा व परीक्षेचे शुल्क कमी करण्याची मागणी, सरकार दरबारी मांडण्याची मागणी यावेळी विध्यार्थ्यांनी पटोले यांच्याकडे केली.