अधिकाऱ्यांची हप्तेखोरी जोरात सुरू ः सर्वसामान्य नागरिक त्रस्त
दौंड- दौंड तालुक्यात महावितरणची हप्तेखोरी जोरात सुरू असल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तालुक्यातील महावितरणच्या कामाबाबत शेतकरी व सर्वसामान्यांना नेहमीच अनेक अडचणी व त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नागरिकांना वीज बिल जास्त आल्यास याबाबत विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर- तुमचे मीटर तपासू व नंतर बदलून दिले जाईल, तुम्ही आत्ता बिल भरा, असे तोंडी आश्वासन दिले जाते आहे. यामध्ये त्या ग्राहकाचे समाधान केले जात नसून उलट तुम्ही बिल भरले नाही तर तुमची वीजजोडणी खंडित केली जाईल, असे सांगितले जात आहे. एखादा ग्राहकाचा विद्युत मीटर फॉल्ट असल्यास जुन्या रीडिंगप्रमाणेच वीजबिल आकारले जात आहे. त्याचा तोटाही ग्राहकालाच होतो. त्यात एखादे वीज मीटर फॉल्टी असल्याने ते बदली करण्यासाठी आलेच तर मात्र त्या ग्राहकाला हे विद्युत मीटर बदलण्यासाठी संबंधितांकडून पैशाची मागणी केली जात आहे.
पैसे असतील तरच तुमचे मीटर आम्ही बदलून देऊ, असे सांगितले जात आहे. जर पैसे दिले नाही तर विद्युत मीटर बदलले जात नाही, तसेच परत घेऊन जातात. पैसे मागितल्यानंतर हे पैसे कशाचे आहेत, पावती मिळणार आहे का, असे विचारले तर तुमचे विद्युत मीटर बदलायचे आहे तर बदला नाही तर आम्ही जातो, असे उद्धटपणे ग्राहकांनाच सुनावले जात आहे. विद्युत मीटर हे महावितरणने बसवले आहेत. त्यात दोष आढळून आल्यास ते बदलून देण्याचे काम महावितरणचेच आहे. मात्र त्यासाठी कोणत्याही प्रकारचा आकारम घेतला जात नाही. सध्या मात्र स्वयंघोषित सर्रासपणे आकार घेतला जात आहे.
- अधिकाऱ्यांचे निर्बंध नाहीत
याबाबत महावितरणचे अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत. त्यांना याबाबत विचारले असता तुम्ही नाव सांगा कोणाची तक्रार आहे? कोणाची अडचण आहे ते सांगा असे उलट विचारले जाते. मात्र सर्रासपणे घेतल्या जाणाऱ्या अशा हप्तेखोरीवर कोणत्याही प्रकारे निर्बंध लावण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून केला जात नाही, त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडूनच अशा कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.