पुनरागमनासाठी आधी स्थानिक स्पर्धा खेळाव्या लागणार
मुंबई: बांगलादेशविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या काही सामन्यांपासून आपल्या खराब कामगिरीमुळे चर्चेत असलेल्या ऋषभ पंतची कामगिरी पहिल्या सामन्यातही सुमारच झाली, त्याचवेळी धोनीला संघात घ्या अशी मागणी जोर धरू लागली होती. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघात पुनरागमन करण्यासाठी एक महत्त्वाची अट घातली आहे. जर धोनीला भारतीय संघात पुनरागमन करायचं असेल तर त्याला आधी स्थानिक क्रिकेट खेळावे लागेल.
कर्णधार रोहित शर्माला फलंदाज बाद असल्याचा निर्णय घेण्यासाठी पंतने चुकीचा सल्ला दिल्यामुळे त्याच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला होता. त्याचवेळी धोनीला स्थान देण्याची मागणी सुरू झाली. मात्र, जोपर्यंत धोनी स्थानिक क्रिकेट खेळत नाही, तोपर्यंत त्याचा विचार केला जाणार नाही, असे संकेत निवड समितीने दिले असल्याचे बोलले जात आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेपासून धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. निवड समितीने काही दिवसांपूर्वी यापुढील काळात धोनीचा विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते.
दुसऱ्या सामन्यावर “महा’संकट
राजधानी दिल्लीतील सामना प्रदूषणामुळे होणार का नाही अशी शक्यता होती. मात्र, हा सामना यशस्वीपणे पार पडला. आता महा चक्रीवादळाच्या भीतीने येथे गुरुवारी होणाऱ्या सामन्यावर देखील अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत.
प्रदूषणाच्या संकटातून मार्ग काढत दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर भारत आणि बांगलादेश या संघांमधील पहिला टी-20 सामना पार पडला. आता गुरुवारी होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. महा या चक्रीवादळाने आपली दिशा बदलली असून हे वादळ गुजरात किनाऱ्याच्या दिशेने पुढे सरकत असल्याने दुसऱ्या टी-20 सामन्याचे भवितव्य अधांतरी आहे.
या सामन्यासाठी राजकोटचे मैदान सज्ज झाले आहे. मात्र, वादळाच्या भीतीने सगळेच चिंतेत आहेत. महा चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीपासून दूर जात होते मात्र, या वादळाने अचानक दिशा बदलली आहे. हे वादळ आता गुजरात किनाऱ्याकडे वळले आहे. त्यामुळे सगळ्या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.