मुंबई – शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हिललाइन पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक देखील केली आहे.
दरम्यान, गायकवाड यांच्या अटकेनंतर आता त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न तसेच शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची माहिती विधिमंडळ सचिवालयाकडे पाठवण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष याबाबत काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
काय आहे प्रकरण ?
शुक्रवारी (2 जानेवारी) रात्री उशिरा भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून पोलीस स्टेशनमध्येच खुलेआम गोळीबार करण्यात आला. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकांच्या समोरच ही घटना घडली. शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड आणि भाजपचे आमदार गणपत गायकवाड दोघेही जमिनीच्या वादाप्रकरणी एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आले होते. तेव्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर ही गोळीबाराची घटना घडली. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारात एकनाथ शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबतचे सहकारी राहुल पाटील हे जखमी झाले.
दोघांवर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर महेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर आहे. महेश गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक आहेत. तर गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व या मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत.
गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर एकूण सहा गोळ्या झाडल्या होत्या. उपचारादरम्यान या सहा गोळ्या डाॅक्टरांनी बाहेर काढल्या आहेत. पोलिसांनी आमदार गणपत गायवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. त्यांना आज शुक्रवारी न्यायालयात हजर केले असून याबाबत काय निर्णय दिला जातो हे पाहणे महत्वाचे आहे.
आमदार गणपत गायकवाड यांच्यावर हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्यांच्यावर IPC अंतर्गत 307, 120 (b) 143, 147, 148, 149 ही कलमे लावण्यात आआली आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी क्राईम ब्रँच एसआयटीची स्थापना केली असल्याची माहिती दिली आहे. ACP निलेश सोनावणे यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे.
या घटनेनंतर राज्यातील राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. सर्वच राजकीय नेत्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार म्हणाले, “उल्हासनगरमधील घटना सर्वांनी पाहिली आहे. आमदार गायकवाड हे वैतागलेल्या माणसासारखे बोलत होते. पण संविधानाने दिलेल्या अधिकारांचा दुरुपयोग होणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे.”
गोळीबाराची घटना कशी घडली –
दोघेही जमिनीचा वाद मिटवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी अचानक गणपत गणपत गायकवाड आणि हर्षल केने यांनी आपल्या जवळच्या बंदुकीतून महेश गायकवाड आणि राहुल गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरूवात केली. याबाबतचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये सर्व घटना दिसत आहे.
गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर एका पाठोपाठ एक अशा चार गोळ्या झाडल्या. महेश गायकवाड यांच्या पोटात आणि इतर अवयवांना चार गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. याचवेळी गणपत गायकवाड यांच्या समर्थकांकडून महेश गायकवाड यांच्या समर्थकांना शिवीगाळ केली. तसंच खुर्च्या फेकून मारण्यात आल्या, असे पोलीस FIR मध्ये म्हटले आहे.
दरम्यान, पोलीस ठाण्यातच हा गोळीबार करण्यात आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून या घटनेप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
आमदार गायकवाड यांची प्रतिक्रिया –
“एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत माझे पैसे बुडवले आहेत. मी आमदार निधीतून केलेल्या अनेक कामांचं श्रेय घेण्यासाठी प्रकल्पाच्या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे जबरदस्तीने आपल्या नावाचा बोर्ड लावतात. एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगारी पोसली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे,” अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे.
संजय राऊत काय म्हणाले ?
“गणपत गायकवाड म्हणत आहेत की एकनाथ शिंदे यांच्यामुळे मी गोळीबार केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंसारखे मुख्यमंत्री असतील तर गुन्हेगारच तयार होतील हे भाजपा आमदाराचं निवेदन आहे. मी वर्षभर सांगतोय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून गुन्हेगाऱ्यांच्या टोळ्यांना कसे दूरध्वनी कसे जात आहेत ते मी सांगितलं. मुंबई, पुणे, कोल्हापूर इथल्या तुरुंगातल्या गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढलं गेलं आहे. मी सगळ्यांची नावंही देऊ शकतो असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हे सगळं फक्त राजकारणासाठी चाललं आहे. एका गुंडाचा पुण्यात खून झाला. मुंबईत तेच सुरु आहे. गुंड टोळ्यांच्या हाती कायदा दिला आहे. तुम्ही सांगाल तो कायदा आम्हाला निवडणूक जिंकून द्या असं चाललं आहे. महेश गायकवाड यांच्यावर आमदाराने केलेला गोळीबार धक्कादायक आहे.”
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?
उल्हासनगर येथील पोलीस स्टेशनमधील घटना पाहिल्यावर एकच दिसून येते. ते म्हणजे भारतीय जनता पार्टीला सत्तेची आणि पैशाची मस्ती आली आहे. त्यांचे (भाजपचे) आमदार म्हणतात पोलिसांना मारा, आता तर त्यांचेच आमदार पोलिस स्टेशनमध्ये अधिकार्यांसमोर गोळीबार करतात. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी घटना कधीच घडली नाही. मागील वर्षी देखील गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणातील व्यक्तींना क्लिन चिट देण्याचं पाप या सरकारने केले आहे. आता तर थेट पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार, त्यामुळे याला गँगवार म्हणावं लागेल. आजपर्यंत सिनेमात पाहत होतो. आता ते वास्तवात आणि रस्त्यावर सुरू झाले आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
श्रीकांत शिंदे यांनी काय म्हटलं?
घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून सत्य काय आहे, ते आता सगळ्यांच्या समोर आलंय. त्यामुळे पोलीस यासंदर्भात सखोल चौकशी करुन कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची थोडक्यात प्रतिक्रिया –
“झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?
फडणवीस म्हणाले की, “कायद्यासमोर सगळे समान आहेत. कोण कुठल्या पक्षाचा आहे हे विचार न करता कायदेशीरच कारवाई केली जाईल. गोळीबाराची ही घटना पोलीस स्टेशनमध्ये का घडली?, गोळीबार झाला याच सत्य आपल्याला काढावा लागेल. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश डीजीना दिले आहेत. या संदर्भात अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल”
आदित्य ठाकरे काय म्हणाले ?
महाराष्ट्र भाजप पुरस्कृत खोके सरकारने घेतल्याने आताच्या कायदा आणि सुव्यवस्थेची ही एक झलक आहे. थेट पोलीस स्टेशनमध्येच पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबार केल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघाले आहेत. राज्यात एका मागोमाग एक सुरु असलेल्या घटनांना महाराष्ट्रात पोलीस खरंच आहेत का? असे विचारण्याची वेळ आली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काय म्हणाले ?
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नसून कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करत आहेत. यावरून महाराष्ट्रात जंगलराज आल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा पोलिसांवर प्रचंड दबाव असून कायद्याने काम करु दिले जात नाही. आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळे त्यांच्यात थोडीशी नैतिकता शिल्लक असल्यास त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.