मुंबई – ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल नऊ टक्क्यांनी वाढून 57 हजारांच्या वर गेला आहे. मंगळवारी सेन्सेक्स 662 अंकांनी म्हणजे 1.16 टक्क्यांनी वाढून 57,552 अंकांवर बंद झाला. त्यामुळे मुंबई शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रीत बाजार मूल्य 250 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
4 ऑगस्ट रोजी सेन्सेक्स 54,000 अंकांवर बंद झाला होता. नऊ दिवसात 13 ऑगस्ट रोजी सेन्सेक्स 55,000 अंकांवर बंद झाला. तर 27 ऑगस्ट रोजी 56,000 अंकांवर बंद झाला होता. त्यानंतर केवळ गेल्या दोन दिवसांमध्ये सेन्सेक्स 57 हजार अंकाच्या पुढे गेला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 17,000 अंकाच्या पुढे गेला आहे.
भारतीय बाजारातील बेफाम तेजीबाबत बोलताना विश्लेषकांनी सांगितले की, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने वर्षाअखेरपर्यंत तरी व्याजदर वाढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आतापर्यंत काठावर बसून असलेले परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतामध्ये गुंतवणूक करीत आहेत.
पहिल्या तीमाहीचा विकास दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर मुडीज् या पतमानांकन संस्थेने भारताचा विकासदर आगामी काळात वाढत राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जीएसटीचे संकलन वाढत आहे. त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थित होत असल्यामुळे रस्त्यावरील टोलचे संकलन वाढत आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात वेगाने वाढणार असल्याचे गुंतवणूकदारांना वाटते.
भारती एअरटेल कंपनी मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी करणार असल्यामुळे या कंपनीच्या शेअरचा भाव आज 7 टक्क्नी वाढला. त्याचबरोबर बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व, एशियन पेंट्स, टायटन, टीसीएस, टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात पाच टक्क्यापर्यंत वाढ झाली.
केवळ नेस्ले, इंडसइंड बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार घट झाली. मंगळवारी शेअर बाजारात खरेदीचा जोर इतका होता की सर्व क्षेत्राचे निर्देशांक पाच टक्क्यांपर्यंत वाढले. मात्र मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये केवळ एक टक्का वाढ होऊ शकली.