मुंबई – भारतीय शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून जागतिक पातळीवर अनेक पूरक घटना घडल्यामुळे गुरुवारी निर्देशांकामध्ये एक टक्का वाढ झाली. मंदीच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. तसेच जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून भारतात खरेदी चालू असल्यामुळे गुरुवारी बरीच खरेदी झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 659 अंकांनी वाढून 59, 688 अंकावर बंद झाला. विस्तारीत पाय असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 174 अंकांनी म्हणजे एक टक्क्याने वाढून 17,798 अंकावर बंद झाला. टेक महिंद्रा कंपनीच्या शेअरचा भाव आज सव्वातीन टक्क्यांनी वाढला. ऍक्सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, महिंद्रा, भारती एअरटेल, स्टेट बॅंक, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बॅंक, एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
टाटा स्टील, एनटीपीसी, टायटन, नेस्ले, पावर ग्रीड या कंपन्यांना मात्र विक्रीचा मारा सहन करावा लागला. जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, सोमवारपासून परकीय संस्थागत गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारात खरेदी चालू असल्यामुळे आता भारतीय गुंतवणूकदारी खरेदी करीत असल्याचे वातावरण शेअर बाजारात आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर 87 डॉलरवर आले आहेत.
याचा भारतीय अर्थव्यवस्थेला सर्वात जास्त फायदा होणार आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी 528 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. मोठ्या कंपन्याबरोबरच छोट्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी वाढल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा स्मॉल कॅप 0.60% तर मिड कॅप 0.29% नी वाढला.
बॅंकिंग, वित्त, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्राचे निर्देशांक वाढल्याचे दिसून आले. मात्र धातू, ऊर्जा, रिऍल्टी क्षेत्रांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. जर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात खरेदी चालूच ठेवली तर आगामी काळात निर्देशांक आगेकूच करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक अगोदरच उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे त्यामध्ये फारशी वाढ होण्याची शक्यता नाही असे काही विश्लेषकांना वाटत असल्यामुळे काय गुंतवणूकदार सावध आहेत.