नवी दिल्ली – एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीतील विकास दराची आकडेवारी केंद्र सरकारने आज जाहीर केली. या आकडेवारीनुसार पहिल्या तिमाहीतील विकास दर तब्बल 20.1 टक्के इतका नोंदला गेला आहे.
मात्र ही आकडेवारी गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या विकास दराच्या तुलनेत आहे. गेल्या वर्षी लॉक डाऊनमुळे पहिल्या तिमाहीतचा विकास दर उणे 24.4 टक्के इतका मोजला गेला होता. त्या तुलनेत आता जाहीर झालेला विकास दर जास्त भासत आहे असे विश्लेषकांनी सांगितले. मात्र तरीही अर्थव्यवस्था खात्रीने आगेकूच करीत असल्याचे हे लक्षण मानले जाते. चीनने एप्रिल- जून या कालावधीचा विकास दर जाहीर केला असून हा विकास दर 7.9 टक्के आहे. त्या तुलनेत भारताचा 20.1 टक्के विकास दर जास्त वाटत आहे.
पहिल्या तिमाहीत विकास दर मोठ्या प्रमाणात वाढल्याबद्दल उद्योजकांच्या संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या पूरक उपाययोजनांमुळे लॉकडाऊन संपल्यानंतर वेगाने अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागली असल्याचे मत या संघटनांनी व्यक्त केले. महागाई सध्या जास्त पातळीवर असूनही रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर कमी पातळीवर ठेवून भांडवल सुलभता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वर्षाअखेरपर्यंत तरी उद्योगक्षेत्राला भांडवलाची कमतरता भासणार नाही. त्यामुळे विकास दर वाढण्यास आणखी चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
सेन्सेक्स 57 हजार अंकावर
भारतीय अर्थव्यवस्था आगेकूच करण्याची शक्यता असल्यामुळे शेअर बाजारात गेल्या तीन दिवसापासून तुफान खरेदी चालू असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स पहिल्यांदाच 57,000 अंकाच्या पुढे गेला. मंगळवारी सेन्सेक्स 662 अंकांनी वाढून 57,552 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी तब्बल 201 अंकांनी वाढून 17,132 अंकांवर बंद झाला. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य 250 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.