नवी दिल्ली – भारताचा विकासदर जगात सर्वात जास्त आहे. त्याचबरोबर भारताची स्थूल अर्थव्यवस्था उत्तम आहे. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे बोलले जात असले तरी भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक चालूच आहे. परिणामी शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य 283 लाख कोटी रुपये या उच्चांकी पातळीवर केले आहे.
सध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 59,793 अंकावर आहे. कोटक सिक्युरिटी या संस्थेचे विश्लेषक अमोल आठवले यांनी सांगितले की. भारतीय शेअर बाजारातून चांगला परतावा मिळेल असे केवळ देशातील गुंतवणूकदारांनाच नाही तर परदेशी गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात खरेदीचा जोर कायम आहे. परवा युरोपच्या रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरामध्ये तब्बल 0.75 टक्क्याची वाढ केल्यानंतर युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले आहेत. या महिन्याच्या अखेरीस व्याजदरात वाढ करण्याचा पुनरुच्चार अमेरिकेच्या रिझर्व्ह बॅंकेने केला आहे.
अशा परिस्थितीत जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारावर परिणाम होणे अपेक्षित होते. मात्र गेल्या दोन दिवसापासून भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले आहेत. भारतातील शेअर बाजारात केवळ देशातीलच गुंतवणूकदार गुंतवणूक करीत आहेत असे नाही तर परदेशातील गुंतवणूकदारहीे गुंतवणूक करीत आहेत. शुक्रवारी परदेशातील गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात तब्बल 2,132 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केले.
जागतिक बाजारात वातावरण नकारात्मक असूनही या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 989 अंकांनी म्हणजे 1.68 टक्क्यांनी वाढला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 293 अंकांनी म्हणजे 1.67 टक्क्यांनी वाढला. भारतीय बॅंकांची परिस्थिती उत्तम आहे. त्यामुळे आगामी काळात या बॅंकांचा नफा आणि उलाढाल वाढण्याची शक्यता असल्यामुळे बॅंकांच्या शेअरची खरेदी होत आहे. त्याचबरोबर वित्तीय कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ होत आहे. दरम्यानच्या काळामध्ये जागतिक मंदीमुळे कच्च्या तेलाचे दर कमी होत आहेत. हे भारताच्या दृष्टिकोनातून जमिनीची बाब आहे.