उरुळी कांचन – संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत विसाव्याच्या ठिकाणी येणार की नाही, याचा निर्णय 5 जूनपर्यंत देहूच्या तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी कळवला नाही तर उरुळी कांचन ग्रामस्थ सत्याग्रह, गावबंद आंदोलन, रस्ता रोको करणार आहेत.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (31 मे) सकाळी पालखी सोहळा चर्चा विषयी ग्रामपंचायत उरूळी कांचन, उरूळी कांचन देवस्थान ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ सेवा समिती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे, उपनिरीक्षक किरण धायगुडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष माऊली कांचन, हवेली बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, सरपंच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, दत्तात्रय कांचन, माजी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन, देवस्थान समितीचे विश्वस्त युवराज कांचन, रामभाऊ तुपे, भाऊसाहेब कांचन, गाव कामगार तलाठी सुधीर जायभाय, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या बैठकीत प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य सुनील तांबे यांनी केले. प्रांताधिकारी संजय आसवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीचा इतिवृत्तान्त ग्रामस्थांना अवगत केला व आपआपली मते मांडण्यास सांगितले. त्यानंतर विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी उरुळी कांचन येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विसावा पारंपारिक पद्धतीने श्री काळभैरवनाथ मंदिरात होतो.पालखी सोलापूर रोड वरून गावात येताना हॉटेल एलाईट चौक ते हॉटेल शैलजा चौक हा जो दिड किलोमीटरचा टप्पा आहे, याला शासन दरबारी पालखी मार्ग अशा प्रकारची मान्यता दिलेली आहे.
यावर शासन निधी टाकून देखभाल दुरुस्ती करीत असते म्हणजेच हा मार्ग अधिकृतपणाने पालखी सोहळ्याचा मार्ग आहे. या मार्गानेच पालखी सोहळा उरुळी कांचन गावातून मार्गस्थ व्हावा अशी भावना व्यक्त केली व वरील इशारा दिला. दरम्यान, प्रशासकीय अधिकारी व पालखी सोहळा विश्वस्त यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी उरुळी कांचन गावाच्या वतीने एक कमिटी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आभार नियोजन मंडळ माजी सदस्य संतोष कांचन यांनी व्यक्त केले.
आम्ही पालखी सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, याबाबतची दक्षता घेतली जाईल्. उरुळी कांचन व पंचक्रोशीतील सुमारे एक लाख लोकांच्या संत तुकाराम महाराज व श्री विठ्ठलाच्या प्रती असलेल्या सद्भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीचा निर्णय होऊ नये. म्हणून प्रशासकीय पातळीवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण म्हणाले.