पालखी सोहळ्यातील जबाबदार मान्यवरांनी व्यक्त केला मानस
पालखीचा प्रस्थान सोहळा 13 जून रोजी होणार
मोजक्या वैष्णवांसह वारी सोहळा करण्याचे मत
पुणे – हैबतबाबांच्या गहन भक्तीने सजलेल्या आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यात मोजकेच भाविक सहभागी होत असत. त्याप्रमाणेच यंदाच्या करोनाच्या सावटामुळे आळंदी ते पंढरपूर या माऊलींच्या पालखी सोहळ्यात मोजक्याच वारकऱ्यांसह पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्याचा मानस पालखी सोहळ्यातील जबाबदार मान्यवरांनी व्यक्त केला आहे. यात माऊलींविषयी असणारी अतूट श्रद्धा तर आहेच त्याचबरोबर पांडुरंगावर श्रद्धा ठेवून लाखोंच्या संख्येने पंढरीला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांची काळजीही आहे.
आषाढी वारीनिमित्त यंदा आळंदीहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा 13 जून रोजी होणार आहे. पुण्यातील सध्याची करोनाच्या संसर्गाची परिस्थिती पाहता, या वारीवर साहजिकच करोनाचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर वारीबाबत “श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी’ने दिंडी मालक, चालक आणि व्यवस्थापक, मानकरी, अन्य तज्ज्ञ आणि वारकरी या सगळ्यांकडून या संदर्भात मते मागवली आहेत. त्यांचे मत विचारात घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जे योग्य असेल त्याला प्राधान्य देऊन सरकार आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने निर्णय करावा. राज्य सरकारच्या आदेशांचे उल्लंघन करून काही निर्णय होऊ नयेत, असे मत दिंडी क्रमांक 157 चे चालक ह.भ.प. उत्तम महाराज शेलार यांनी मांडले आहे. यांच्याशिवाय अन्यही प्रमुखांनी आपापली मते संस्थानला कळवली आहेत.
माऊलींचा हा प्रवास पारंपरिक रथामधून न करता सजवलेल्या ट्रकमध्ये पालखी ठेवून वरीलप्रमाणे 10 व्यक्तींनी ट्रकसोबत प्रवास करावा. आजोळघर आळंदी येथून निघाल्यानंतर पालखीचा ट्रक कोठेही न थांबता थेट पंढरपूरमध्ये प्रवेश करेल. म्हणजे भाविक, वारकरी अथवा गावकरी रस्त्यावर एकत्र थांबणार नाहीत. सरकारच्या नियमांचे योग्य पालन होईल, असेही सूचवले आहे. माऊलींचा आषाढी वारी पालखी सोहळा हा वारकऱ्यांच्या संख्येवर आधारित नसून, परंपरेप्रमाणे हा सोहळा होणे महत्त्वाचे आहे, असे सांगून प्रारंभीच्या काळात ह.भ.प. वै. हैबतबाबांनी गळ्यात पादुका बांधून मोजक्या वारकऱ्यांसोबत वारी केल्याचा दाखलाही यावेळी देण्यात आला.
मोजक्या 10 व्यक्तींची पादुकांसोबत वारी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पंढरपूर पायीवारीमध्ये खंड पडू नये आणि वारकरी संप्रदायाची परंपरा अखंड रहावी यासाठी अत्यंत मोजक्या 10 व्यक्तींनी माऊलींच्या पादुकांसोबत आळंदी ते पंढरपूर वारी करावी, असे दिंडी प्रमुखांनी सूचवले आहे. या प्रमुखांमध्ये सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, त्यांच्यासोबत एक वारकरी, एक विणेकरी, एक चोपदार, माऊलींचे दोन पुजारी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे दोन विश्वस्त, मानकरी आणि सेवेकरी प्रत्येकी एक असा सहभाग ठेवावा. असे ह.भ.प. उत्तम महाराज शेलार यांचे म्हणणे आहे.
चैत्र शुद्ध दशमीला याबाबतचा आराखडा आपण तयार करतो. परंतु यंदा लॉकडाऊनमुळे विश्वस्त आणि प्रमुख मंडळींना एकत्र येताच आले नाही. काहीजण मराठवाडा, पंढरपूर आणि अन्य भागात आहेत. त्यामुळे आपण सगळ्या प्रमुखांची मते मागवली आहेत. तीन मे रोजी लॉकडाऊन उठला तर त्यानंतर बैठक घेऊन निर्णय घेता येईल. मात्र या विषयात विचारपूर्वक निर्णय घेण्यात येणार आहेत. चैत्रवारी, आळंदीची कार्तिकी वारी या देखील परिस्थिती पाहून रद्द केल्या आहेत. त्यामुळे या विषयातही तसाच सर्वसमावेशक निर्णय घेण्यात येईल.
– राजाभाऊ चोपदार, श्री ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार