गावागावांतील तरुणाईकडून जुन्याजाणत्यांना सुरूंग
पुणे : राज्यात आता लवकरच ग्रामपंचायतनिवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यामुळे गावागावातील इच्छुक तरूणांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे परंपरागत अशिक्षित (फक्त सहीचा अधिकारअसलेला) खांद्यावर हात ठेवून गावागावात सत्ता स्थापन करणाऱ्या सह्याजीरावाचे अस्तित्व आता संपुष्टात येण्याची चिन्हे गाव पातळीवर दिसू लागली आहेत. परंतु मतदार तरुणांना पसंती देणार की परंपरागत सत्ताधाऱ्यांच्या आमिषाला बळी पडणार? हे 18 डिसेंबरच्या आखाड्यानंतरच समजेल.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीला परवानगी दिल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक पुढीलमहिन्यात पार पडत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम पार पडणार असल्याने या निवडीकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच गावागावांत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. त्यासाठी दि. 28 नोहेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे.
त्यामुळे उच्चशिक्षित तरूण इच्छुकांनी जुन्या प्रस्थापितांच्या विरोधात रणशिंग फुंकत निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. आता हवा नवा पर्याय म्हणत गावागावांतील तरूणाईचा सुशिक्षित उमेदवारांकडे कल असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सध्या तरूणांकडून इच्छुक उमेदवार नागरिकांसह गाव नेत्यांच्या भेटी घेण्यास जोरदार सुरूवात केली आहे. सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय हा यापूर्वीच घेण्यात आलेला होता. परंतु महाविकास आघाडी सरकारने ह्या निर्णयास स्थगिती देऊन सरपंचाची निवड ही सदस्यांमार्फत करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले आहे, त्यांनी सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय पुन्हा घेतला आहे. त्यानुसार सरपंचपदाची निवडणूक थेट पद्धतीने अवलंबण्यात येणार आहे. त्यामुळे गावागावांत गावकी – भावकीच्या राजकारणाला वेग येणार आहे.
उच्चशिक्षित उतरणार रिंगणात?
आता जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने गावागावांत मोठी चुरस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक उच्चशिक्षित तरुणही निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटांकडून पॅनेल जुळवणीची तयारी सुरू झाली आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा आता मतदारांसमोरमांडावा लागणार आहे. परिणामी प्रचारात आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत.
गावागावांत होऊ दे चर्चा…
सध्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पॅनेल प्रमुखांकडून उमेदवार जुळवा जुळवीसाठी राजकीय कसरत सुरू झाली आहे. आगामी मोर्चेबांधणीसाठी गावातील जाणत्या नेत्यांनी तरुणांना साद घालत निवडणुकीच्या तयारीला लागा, अशी भावनिक सादघातली आहे. त्यामुळे गावागावांतील पारावर ग्रामपंचायत निवडणुकींच्या चर्चांना ऊत आला आहे.
राहुल गणगे