सांगवी, दि. 15 (वार्ताहर) – सांगवी, पिंपळे गुरव परिसरात रस्त्यांच्या बाजूला ट्रॅव्हल्स लावण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार केल्यानंतर सांगवी पोलीस वाहतूक विभागाने मात्र जुनी सांगवीतील बेकायदा वाहनांवर कारवाई करीत रस्त्यांवरील वाहने हटविली. त्यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
जुनी सांगवीतील बॅंक ऑफ महाराष्ट्र ते माकन हॉस्पिटल चौकादरम्यान सिमेंट कॉंक्रीट रस्त्याच्या कडेला गेल्या सहा महिन्यांपासून वाहने लावली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली होती. तसेच या रस्त्यावर अपघातांचे प्रमाणही वाढले होते. सांगवी वाहतूक पोलिसांच्या गाड्या दररोज या रस्त्यावरून ये-जा करीत होत्या. मात्र, वाहतूक पोलिसांना येथील बेकायदा वाहने दिसत नव्हती. याचा वाहनचालक व नागरिकांना त्रास होत होता. या ठिकाणच्या वाहतूक कोंडीत काही दिवसांपूर्वी एक रुग्णवाहिका अडकली होती. नागरिकांच्या प्रयत्नांनी रुग्णावाहिकेला मोकळी वाट करून
दिली होती.
स्मार्ट सिटी अंतर्गत सिमेंट कॉंक्रीटचा मोठा रस्ता करण्यात आला आहे. या रस्त्यावरून सांगवी फाटा, औंध, नवी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी याकडे ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. नियमित या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. बाजारपेठ, बॅंक, उद्यान यामुळे पादचारी नागरिकांची मोठी वर्दळ असते.
हा रहदारीचा रस्ता असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, बेकायदा पार्किंगमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या परिसरात उद्यान, शाळा, बाजारपेठ, बॅंक आहे. येथे कायम दोन्ही बाजूला उभ्या करण्यात आलेल्या वाहनांमुळे रस्ता अपुरा होत आहे. वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी नित्य कारवाई सुरू ठेवणे आवश्यक आहे.
– राजू सावळे, मनसे, शहर उपाध्यक्ष.
या ठिकाणच्या पार्किंगच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काम सुरू आहे. नागरिकांनीही रस्त्याला अडथळा होऊ नये, याची खबरदारी घेऊन सहकार्य करावे.
– प्रसाद गोकुळे, वाहतूक पोलीस निरीक्षक, सांगवी विभाग.
पादचाऱ्यांची गैरसोय
रस्त्याच्या पदपथावर नागरिकांना व्यायामासाठी ओपन जिमचे साहित्य बसविण्यात आलेले आहे. यामुळे व्यायामासाठी या परिसरात मोठी गर्दी असते. मात्र, रस्ता मोठा असूनही केवळ दुतर्फा पार्किंगमुळे नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी व रहदारीसाठी कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्यावर दुतर्फा स्कूल बस, चारचाकी वाहने, मालवाहतूक वाहनांच्या पार्किंग केलेल्या रांगा नियमित कायम उभ्या राहत असल्याने रस्ता कशासाठी असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात होता.