मुंबई – मे महिना संपताच मान्सूनची प्रतिक्षा सर्वजण करत असतात. त्याच संदर्भात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. यावर्षी मान्सून वेळेत दाखल होणार आहे. पुढील दोन दिवसात म्हणजेच 27 मेपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाने माहिती देण्यात आली आहे.
19 मे रोजीच नैऋत्य मान्सूनने अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भागात धडक दिली होती. मात्र, त्यात अजून प्रगती झाली नसल्याचे स्कायमेटचे अध्यक्ष जीपी शर्मा यांनी सांगितले आहे. दक्षिण अरबी समुद्रात मान्सून प्रस्थापित होण्यास सुमारे एक आठवडा लागेल. त्यामुळे मान्सून केरळमध्ये दाखल होण्यास काहीसा उशीर होइल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हिंद महासागरातील मान्सून वाऱ्यांचा परिणाम होत असल्याने केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवर्षी 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून हा या वर्षी 4 जून रोजी दाखल होणार आहे. तर केरळात 7 जूननंतर मुसळधार पाऊस होईल, असा स्कायमेटचा अंदाज आहे. तर मुंबईत मान्सून 11 ते 12 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे.
तापमानात घट होणार
दरम्यान, काही दिवसातच मान्सूनचे आगमन होणार असल्याने राज्यातील कमाल तापमानात 5 ते 6 अंशांपर्यंत घट होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.