वाल्हे – मंगळवार (दि.७) जुलै रोजी वाल्हे (ता. पुरंदर) येथील मुकदमवाडीत कुर्ला (मुंबई) येथून आलेल्या एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे संपूर्ण गाव चिंताग्रस्त झाले होते. त्याला कोविड केअर सेंटरला हलविल्यानंतर गावात कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या. अखेर दोन दिवसापूर्वी त्याने कोरोनावर मात करून आपल्या घरी परतला. त्यामुळे वाल्हेकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
वाल्हे गावाच्या शेजारील गावामध्ये पिंगोरी, जेजुरी, परिंचे, वीर, सासवड अशा विविध ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत असताना वाल्हेकर मात्र निश्चिंत होते. दरम्यान, (कुर्ला) मुंबई येथे वास्तव्यास असलेली एक व्यक्ती चौदा दिवसांपूर्वी आपल्या मुळगावी आली. थोडासा त्रास जाणवू लागल्याने दवाखान्यात दाखल झाली. त्यावेळी त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे वाल्हेकरांच्या पायाखालची वाळू सरकली.
संपूर्ण वाल्हे गाव पंचक्रोशीमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. तातडीने वाल्हे ग्रामपंचायत, पोलिस प्रशासन आणि कोरोना सुरक्षा समिती यांनी तत्परतेने येथील मुकदवाडीसह गावात निर्जंतुकीकरण करून घेत आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मदतीने मुकदमवाडीसह गावाचादेखील सर्वे केला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कोरोनाबाधीत व्यक्ती बरी होऊन घरी परतली असून, त्यांच्या संपर्कातील तीन व्यक्तींचे देखील कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने वाल्हेकरांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटुन महर्षि वाल्मिकऋषींची ही वाल्मिकभूमी अखेर कोरोनामुक्त झाली आहे.
या बाबत बोलताना वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले व ग्रामविकास अधिकारी बबन चखाले म्हणाले, की “गावातील एकमेव कोरोना पॉझिटिव्ह असलेला रुग्ण बरा झाल्याने गावाच्यादृष्टीने ही आनंदाची बाब आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. गावात बाहेरून आलेल्या जवळपास ६५ व्यक्तींची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन केलेले आहे. ते देखील स्वत: काळजी घेत आहेत”.
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत व महसूल कर्मचारी हे सर्व प्रशासकीय कर्मचारी गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आघाडीवर लढत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी निष्काळजीपणे न वागता सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटाझर वापरणे, सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा, लग्न, पूजा, वाढदिवस आदी गर्दीचे कार्यक्रम टाळणे अपेक्षित असून, ही काळजी घ्यावी अन्यथा येणाऱ्या कोरोना आपत्तीतून आपणास कोणीही वाचवू शकणार नाही”. असे मत पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले आहे.