कबीर बोबडे
नगर – कौटुंबिक कलहातून दिलासा पथकाकडे जानेवारी 2018 ते आक्टोबर 2019 या कालावधीत 3,492 केसेस दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 3,034 केसेसचा दिलासा पथकाकडून निपटारा करण्यात आला. दाखल करण्यात आलेल्या एकूण केसेस पैकी 1,106 केसेस मध्ये समेट घडवून पीडितांच्या संसाराची घडी बसवण्यात दिलासा पथकाला यश आले.
मुलगी लग्न होऊन सासरी गेली की, बऱ्याचदा सासरच्यांकडून तिचा शारीरिक, मानसिक छळ सुरू होतो, माहेरच्या मंडळीकडून देखील मुलींच्या संसारात बऱ्याचदा हस्तक्षेप केला जातो तर कधी नवरा बायकोत छोटया-छोट्या गोष्टीवरून वाद होऊन त्या केसेस दिलासा सेलकडे येतात. अशातच 1,106 कुटुंबाचा संसार दिलासा सेल ने जुळवल्याची माहिती समोर आली.
दरम्यान,दिलासा समितीकडे 21 महिन्यात 3492 केसेस प्राप्त झाल्या असून यामध्ये 458 केसेस वर कायदेशीर कारवाई करतांना तडजोड किंवा निपटारा होऊ शकला नसून त्या केसेस अजूनही पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत आहे. 817 केसेसमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दाखल करण्यात आल्या आहेत. 410 केसेस मध्ये मध्ये गुन्हा (498 कलम) चा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत 154 केसेस ह्या कौटुंबिक हिंसाचाऱ्याच्या होत्या. 513 तक्रारी अर्ज हे दप्तरी अर्ज म्हणून दाखल झाले. तर आता पर्यंत 1,106 केसेस मध्ये समेट घडवून आणल्या गेला.
8 केसेस चा निपटारा करतांना दिलासने मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली. 11 केसेस मध्ये पीडितेला विधी सेवा दिली. तर 16 केसेस मध्ये आपसात घटस्फोट मिळवून दिला, असल्याची माहिती दिलासा पथकाने दिली. दिलासा सेल ह्या केस मध्ये सोडवण्यासाठी स्नेहालय, स्नेहाधार, पीस फाउंडेशन या सारख्या सामाजिक संस्थांची देखील मदत घेऊन केसेस चा निपटारा करते. पिडीतांचे पुर्नवसन देखील केले जाणार आहे.
दिलासाकडे अनेक तक्रारी येतात. त्याची कारणे फार वेगवेगळी असतात. संशय, विवाहबाह्य संबंध, मारझोड, मानसिक छळ यासारख्या अनेक तक्रारी येतात. पीडितेला न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असतोच. परंतु, पती- पत्नीमध्ये समेट घडवून त्यांच्या संसाराची विस्कटलेली घडी नीट करून देण्याचा दिलासाचा प्रयत्न असतो.
-जयश्री काळे, पोलीस उपनिरीक्षक, प्रभारी- दिलासा सेल