पाटण – विधानसभा निवडणुकीत आपल्या ढेबेवाडी, कुंभारगाव विभागात कोणी प्रामाणिकपणे काम केले व कोणी गद्दारी केली याचा स्थानिकच हिशोब घेतील. परंतु त्यात लक्ष घालण्यापेक्षा जनमताचा कौल स्वीकारून येणाऱ्या काळात पूर्वीपेक्षाही जास्त काम करून आपल्या विभागांना सर्वोतोपरी न्याय देणे हाच माझा प्राधान्यक्रम असेल.
येणाऱ्या काळात आपल्या विभागासह पाटण विधानसभा मतदारसंघात जे -जे चांगलं, सकारात्मक व विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल या बाबी आपण करूया यात तुमची साथ मला कायम द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले.
विधानसभा निवडणुकीत मतदान केलेल्या मतदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या ढेबेवाडी, कुंभारगाव मतदारसंघातील आभार दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, राष्ट्रवादी, राष्ट्रीय कॉंग्रेस मित्र पक्ष महाआघाडी, श्रमिक मुक्ती दलाचे आजी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सत्यजीतसिंह पाटणकर पुढे म्हणाले, निवडणुकात जय पराजय अपेक्षित असतोच त्यामुळे विजयाने हुरळून जाणारा किंवा पराभवाने खचणारा पाटणकर गट अथवा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नाही. त्यामुळे आता झालेल्या चुका टाळून भविष्यात पुन्हा नव्याने कामाला लागायचे आहे. जे येतील त्यांच्यासह व जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय आपल्याला यापुढची लढाई लढायची आहे.
या विभागातील निष्ठावंत व प्रामाणिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जिवावर आपण यापुढच्या सर्व लढाया यशस्वी करू असा माझा ठाम विश्वास आहे. निवडणुकांच्या काळात काय झालं काय नाही झालं यावर निश्चितच आत्मचिंतन, आत्मपरिक्षण झालेच पाहीजे. परंतु कोणाच्या तरी डोक्यावर याचं खापर फोडण्यापेक्षा त्या-त्या काळात आपापली जबाबदारी आपण किती प्रामाणिक व समर्थपणे पार पाडली याचा विचार केला तर निश्चितच आपल्याला उत्तर मिळेल.
त्यामुळे यापुढे जर स्वतःला, गटाला व पक्षाला अच्छे दिन आणायचे असतील तर मग आपापसातील मतभेद, गटतट, अहंमपणा आदी सर्वच बाबींना कायमची मूठमाती देवून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा नव्याने कामाला लागा भविष्यकाळ फक्त आपलाच असेल, असा विश्वासही सत्यजीतसिंह पाटणकर यांनी व्यक्त केला.