वाई – खंडाळा व किसन वीर हे दोन्ही कारखाने आर्थिक अडचणीत असताना आमदार मकरंद पाटील यांनी उचललेल्या शिवधनुष्यास सभासदांनीही समर्थपणे साथ दिली. खंडाळा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करणार असल्याच्या जनतेला दिलेल्या शब्दाची पूर्ती झाल्यामुळे आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने शुभ आहे. नवीन कारखाना काढणं सोप आहे. परंतु, आर्थिक अडचणीत आलेले कारखाने बाहेर काढण्याचा निर्णय खूप धाडसाचा आहे. तो निर्णय आपण घेतल्याबद्दल धाडसाचं कौतुक करावं लागेल, असे विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक- निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
किसन वीर खंडाळा साखर कारखान्याचा गळित हंगाम शुभारंभ रामराजे यांच्या हस्ते व आमदार शशिकांत शिंदे, किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. रामराजे म्हणाले, “”खंडाळा कारखान्याचा गळित हंगाम शुभारंभ माझ्या हस्ते झाला याचा मला मनस्वी आनंद आहे. मागील संचालक मंडळाने काय केले याकडे न पाहता त्यांच्यातून फक्त घडे घ्यायचे व त्यातून पुढे जायचे असते.
आमदार मकरंद पाटील यांनी किसन वीर व खंडाळा कारखान्याची निवडणूक लढविली नसती तर आज कारखान्यांचे लिलाव झाल्याशिवाय राहिले नसते. आज कारखाना सुरू झाल्यामुळे पहिली परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. कारखाने अडचणीत आणले त्यांना त्याचे काहीही घेणं-देणं नाही. सर्व देणं विद्यमान व्यवस्थापनाला द्यावं लागतं. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी व कामगार सुखात जगला पाहिजे.
सभासदांनी आमदार मकरंद पाटील यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थकी ठरविण्याचे आवाहनही त्यांनी केले. शशिकांत शिंदे म्हणाले, “सध्याच्या युगामध्ये आव्हान स्वीकारणे सोपे नाही. ते राजकारणातील असो की विकासाचे असो कि उद्योग धंद्याचे, रोज बदलणाऱ्या धोरणांना आव्हान म्हणून स्वीकारण्याची तयारी ज्याच्या मनगटामध्ये असते त्याला जनाधार आवश्यक असतो आणि जनाधार पाठीमागे असल्यामुळेच किसन वीर व खंडाळा कारखान्यांमध्ये इतिहास घडला. मकरंद पाटील यांनी दोन्ही कारखान्यांकरिता आमदारकीचाही विचार केला नाही, त्यांच्यावर आपणही तेवढाच विश्वास टाकावा, असे आवाहन शिंदे यांनी केले. खंडाळा कारखान्याबाबत दिलेला शब्दाची पूर्ती केल्याचा आनंद होत असल्याचे सांगून आमदार मकरंद पाटील म्हणाले, “”खंडाळा कारखाना सात वर्षांपुर्वी सुरू झाला. परंतु, मागील व्यवस्थापनाच्या भोंगळ व भ्रष्ट कारभारामुळे कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला.
फक्त खंडाळाच नव्हे तर मातृसंस्था असलेला किसन वीर व पर्यायाने प्रतापगड कारखानाही अडचणीत आला. मागील हंगामात शेतकऱ्यांच्या पिळवणुकीचा मनस्ताप खूपच त्रासिक होता. घरचा कारखाना असूनही ऊसासाठी दुसऱ्याच्या दारात जाणे ही परिस्थिती खूप वाईट होती. कारखाना चुकीच्या व्यवस्थापनाच्या हाती गेल्यावर काय होते त्याचे हे प्रत्यंतर होते. आमदारकी पणाला लावुन कारखानदारीचे आव्हान स्वीकारले. कारखाना सुरू झाला म्हणुन अडचणी संपल्या असा होत नाही. तर भागभांडवल पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मदत करणे गरजेचे आहे. महिनाअखेरपर्यंत किसन वीरही सुरू होणार आहे. दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने चालविणार आहे.”शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे भाव देणार असून नोंद केलेला ऊस कारखान्याला घालण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले. शेतकऱ्यांनी भागभांडवल वाढविण्याबाबत व ऊस कारखान्याला घालण्याचे आवाहन “किसन वीर’चे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, नितीन भुरगडे यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले. चंद्रकांत ढमाळ यांनी आभार मानले.