विक्रम कुंभार
परतीच्या पावसाने बळीराजाच्या डोळ्यात आणले पाणी
हेळगावसह परिसरात पिकांचे मोठे नुकसान
हेळगाव – गेल्या पंधरा दिवसापासून दिवसात कमीत कमी एकदा आणि कमी वेळात मुसळधार पडणाऱ्या पावसाने हेळगावसह परिसरात शेती पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे बळीराजा पुरताच वैतागला असून पाऊस…. नको रे बाबा…! असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे.
साधारण सप्टेंबर महिनाअखेर म्हणजेच मान्सूनच्या परतीच्या पावसाचा कालावधी. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न पडल्याने पेरण्यासह सर्व मेहनतीचा कालावधीत पुढे सरकला आणि त्यानंतर कमी अधिक प्रमाणात का होईना; दररोज थोडासा पाऊस पडत होता. गरजेप्रमाणे नाही, पण हलक्या स्वरूपात पाऊस येत होता. यामुळे सप्टेंबर अखेरीस काढणीस येणाऱ्या भुईमूग, सोयाबीन व कडधान्य ही पिके उशिरा म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात काढणीस आली.
परंतु, यावेळी नेमका पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असून दररोज अर्धा तास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. भरपूर पडणाऱ्या या पावसाने सध्या शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचले असून सध्या सुरू असणारी सोयाबीन, भुईमूग व कडधान्य काढणीच्या कामात व्यत्यय येत आहे. तसेच हातात तोंडाला आलेले पीक शेतकरी पदरात घेऊ शकत नाही. अशीच काहीशी अवस्था झाली शेतकऱ्यांची झाली असून हाताला आलेली पिके पावसामुळे वाया जाऊ लागली आहेत. त्यातूनही प्रयत्न करून काढलेल्या पिकांना म्हणावा तसा सूर्यप्रकाशही मिळत नसल्याने पिक काढावे तरी नुकसान आणि न काढावे तरी नुकसान; अशा द्विधा मनस्थितीत बळीराजा अडकला आहे.
भरपाई देऊन बळीराजाची दिवाळी गोड करावी
दिवाळीच्या तोंडावर भरोसाच्या पिकाकडूनच धोका होऊ लागल्याने निसर्गामुळे बळीराजाची यावर्षीची दिवाळी गोड होणार नाही; अशी शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी वर्ग पुरताच घाबरून गेला आहे. प्रशासनाकडून याबाबतची गंभीर दखल घेऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देऊन त्यांची येणारी दिवाळी गोड करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.