जामखेड -विमा संरक्षण योजनेतून वगळण्यात आलेल्या लिंबू पिकाला विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी आ. रोहित पवार यांच्याकडे केली होती. त्यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा केल्याने आता लिंबासह इतरही फळपिकांना विमा संरक्षण लागू झाले आहे. याचा लाभ राज्यातील 14 जिल्ह्यांना होणार आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आ. पवार मागील वर्षभरापासून पाठपुरावा करत आहेत. याबाबत त्यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत निवेदन दिले होते. तसेच हवामान आधारित फळपिक योजनेमधून सन 2019-20 पासून लिंबू व पेरू हे पिके वगळली होती. त्यापूर्वी जामखेड तालुक्यामध्ये दोन हजार 500 हेक्टरवरील लिंबू पिकासाठी जवळपास पाच कोटी 50 लाखांची विमा रक्कम मिळाली होती. मात्र त्यानंतर ही पिके विम्यातून वगळल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
मात्र आ. पवार यांच्या पाठपुराव्यामुळे लिंबू, संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू या फळपिकांनाही विमा लागू होणार आहे. आहे. आमदार रोहित पवारांच्या या पाठपुराव्याने पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना सन 2020-21,2021-22, 2022-23 या तीन वर्षांसाठी मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू व लिंबू या या सहा फळ पिकांसाठी व आंबहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष व प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी या आठ पिकांकरीता लागू करण्यात आली आहे.
या योजनेचा नगर, बुलडाणा, जळगाव, परभणी, सोलापूर, पुणे, जालना, धुळे, वाशीम, नाशिक, उस्मानाबाद, अमरावती, नांदेड, लातूर अशा एकूण 14 जिल्ह्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एकूण विमा संरक्षित रक्कम ही प्रतिहेक्टरी 70 हजार एवढी राहणार आहे.