नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील तणाव हा दिवसेंदिवस वाढतंच आहे. त्यात दोन्ही देशांनी आपापल्या नियंत्रण रेषेवर आपले सैन्य तैनात केले असल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. एका इंग्रजी वर्तमानपत्राने भारतीय लष्कराच्या हवाल्याने याविषयी माहिती दिली आहे.
पश्चिम, मध्य आणि पूर्व या तीन सेक्टरमध्ये रणनितीक दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी दोन्ही देशांनी आपले सैन्य तैनात केले असले तरी तिथे पूर्व लडाखसारखी स्थिती नाही. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर उभे आहेत. सहा जून रोजी दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. त्यापूर्वीच मे महिन्यात दोन्ही देशांनी सर्व सीमांवर सैन्य तैनात केले. भारत आणि चीनमध्ये ३४८८ किलोमीटरची सीमारेषा आहे.
लडाखमध्ये महत्वाच्या ठिकाणी भारताने १० हजार सैन्य तुकडया तैनात केल्या आहेत. चीनने ज्या पद्धतची खेळी केली. भारताने सुद्धा त्याला तसेच उत्तर दिले. लडाखमध्ये गालवान, हॉट स्प्रिंग या भागात दोन्ही देशांनी सैन्य थोडे मागे घेतले आहे. चीन बरोबर सुरु असलेल्या या वादामध्ये लगेच काही निष्पन्न होणार नाही. दोन्ही देशांमध्ये लगेच कुठला शांतता करार होणार नाही. ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. भारतही त्यासाठी तयार आहे. शनिवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेली प्रदीर्घ चर्चा हे त्या दिशेने उचललेले सकारात्मक पाऊल आहे.
भारताने लडाखमधील उंचावरील या युद्ध क्षेत्रामध्ये अतिरिक्त सैन्य तुकडया आणि शस्त्रास्त्र तैनात केली आहेत. एप्रिलच्या मध्यापर्यंत या भागामध्ये नियंत्रण रेषेवर जी स्थिती होती, तीच पूर्ववत करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत. शनिवारच्या बैठकीत दोन्ही देशांनी सीमेवर शांतता राखून चर्चेच्या माध्यमातून वादावर तोडगा काढण्याचे ठरवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.