जनतेतून थेट सरपंच निवडीमुळे चुरस
बारामती तालुक्यात मोर्चेबांधणीला वेग
नवनाथ बोरकर
डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता बारामती तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये बारामती तालुक्यातील तेरा गावांचा समावेश असून यात महत्त्वाचे म्हणजे लोणी भापकर, मोरगांव, आणि पणदरे या मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 13 गावांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आगामी जिल्हा परिषदेची रंगीत तालीम या गावांत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये लोणी भापकर, पळशी, मासाळवाडी, पणदरे, सोनकसवाडी कुरणेवाडी, वाघळवाडी, मुरूम, वानेवाडी सोरटेवाडी, गडदडवाडी, मोरगाव, काऱ्हाटी या 13 ग्रामपंचायतींचा निवडणुकीमध्ये समावेश आहे. सध्या स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी, रणनीतीला वेग आला आहे. त्यामुळे उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. यावेळी प्रबळ उमेदवार हा निकष ठरणार आहे.
2 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. आतापासून इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. तालुक्यातील तेरा गावांत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्यात सध्या शिंदे गट आणि भाजपचे सरकार आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी ही विरोधात आहे.
बारामती तालुका हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. या 13 पैकी जवळपास सर्वच ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली जाईल, अशी शक्यता कमी वाटत आहे. कारण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अनेक भाषणात स्थानिक पातळीवर निवडणूक या स्वबळावरच लढवणार असल्याचे जाहीर केले होते तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गट मात्र ग्रामपंचायत निवडणूक एकत्र लढवणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
13 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजप ताकदीने निवडणूक लढणार आहे. भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आल्यावर लगेचच या सरकारने सरपंचपद हे थेट जनतेतून होणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, हा निर्णय गावाच्या हिताचाच आहे. यामुळे जनता नक्कीच भाजप आणि शिंदे गटाच्या पाठीशी राहील, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे बारामती तालुक्यात आम्हाला नक्कीच यश येईल, असा विश्वास असल्याचे भाजप तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी सांगितले आहे.