पुणे/हडपसर, दि. 10 (प्रतिनिधी) -बीआरटी ही शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीचा महत्वाचा घटक असून, ती कोणत्याही स्थितीत बंद केली जाणार नसल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट करताना वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गरज भासल्यास बीआरटी मार्गातून शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या बस, एसटी तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही प्रवेश देण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले होते. परंतु, प्रत्यक्षात मात्र हडपसर-स्वारगेट हा बीआरटी मार्ग बंद असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगितले जात असताना या मार्गावरील सर्वच्या सर्व म्हणजे बसथांबे काढून टाकण्याचा धडाका पीएमपीने लावला आहे. आयुक्तांचा निर्णयाला पीएमपीने गांभीर्याने घेतला नसल्याचेच यावरून प्रथमदर्शी दिसत आहे.
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील बीआरटी मार्ग बंद करण्याची मागणी केली त्यावेळी आयुक्तांनी यास स्पष्टपणे नकार दिला. पोलिसांच्या मागणीनंतर महापालिकेनेही पीएमपीला पत्र पाठवित बीआरटी बंदबाबत विचारणा केली. परंतु, आयुक्तांनी त्यास स्पष्ट नकार दिला. परंतु, हडपसर ते फातीमानगर पर्यंतच्या बीआरटी मार्गाबाबत पीएमपी वेगळेच धोरण अवलंबत आहे. गेल्या दोन दिवसांत या मार्गावरील दोन बसथांबे उखडून काढण्यात आले. शंकरमठावरील बसथांबा काढण्यात आल्यानंतर आज (दि.10) फातीमानगर क्रोम चौकातील बसथांबाही काढण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना आता उन्हांत बसची वाट पाहत थांबावे लागत आहे. यातून ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थी, महिला यांचे गैरसोय होत आहे. आयुक्तांकडून पीएमपी, बीआरटीबाबत सकारात्मक धोरण असताना हडपसर-फातीमानगर या मार्गावरील बसथांबे का काढले जात आहेत? असा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नव्या बसथांब्यांवर पैशांची उधळपट्टी?
हडपसर बीआरटी मार्गावरील बसथांबे धोकादायक झाले आहेत त्यामुळे पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांच्या आदेशानुसार प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ते काढण्यात येत असून तेथे नवीन बसथांबे बसविण्यात येत असल्याचे पीएमपीचे सिव्हिलचे मुख्य अभियंता दत्तात्रये तुळपुळे यांनी सांगितले आहे. परंतु, याच मार्गावरील किर्लोस्कर पुलावरील आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेला बसथांबा 10 महिन्यांपूर्वी काढून टाकण्यात आला त्यानंतर तो अद्यापही बसविण्यात आलेला नाही. मुळातच लाखो रुपये खर्च करून नव्याने तयार करण्यात आलेले बसथांबे धोकादायक झालेच कसे? की नव्याने बसथांबे तयार करण्यासाठी नव्याने निविदा काढून पैशांची उधळपट्टी करण्याचा हा प्रकार तर नाही ना? अशी चर्चा प्रवाशांत आहे.