प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 26 -करोना संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी शहरात गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हा उत्सव, सुरक्षित, प्रदूषणमुक्त तसेच पर्यावरणपूरक साजरा करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यावर्षीही पालिकेकडून शहरात निर्माल्य संकलन, मूर्तीदान असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मात्र, त्या सोबतच यंदा पहिल्यांदाच महापालिका शाडू मातीच्या मूर्ती पालिकेच्या विसर्जन हौदावर विसर्जित केल्यानंतर अथवा घरी विसर्जन केल्यानंतर नागरिकांकडे राहणारी शाडूची माती संकलित करणार असून, त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. विसर्जन घाटांवरही या मातीची संकलन केंद्रे उभारली जाणार आहे. शहरातील स्वयंसेवी संस्था आणि महापालिका अशा प्रकारचा उपक्रम यंदा पहिल्यांदाच राबवित असून, त्याला “पुनर्वतन’ हे नाव देण्यात आले आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करताना घातक रसायन वापरले जात. त्यामुळे ही मूर्ती पाण्यात मिसळल्यानंतर पाण्याचे प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून गेल्या अनेक वर्षांपासून मूर्तीदान संकलन केंद्रे उभारण्यात येत असून, यंदाच्या वर्षीही अशी केंद्रे उभारली जाणार आहेत. त्याची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे.