खेडच्या तहसीलदारांचे शेतकऱ्यांना आवाहन
राजगुरुनगर – पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील खेड तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी ईकेवायसी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी केले आहे.
आधारकार्ड जोडणी ईकेवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या महासंग्राम कक्षाशी संपर्क साधून आधारकार्ड जोडणी करुन घ्यावी. महा ई सेवा केंद्रात या सुविधा सुरू आहेत. ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला ईकेवायसी करण्याबाबतच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतीत आणि तलाठी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ईकेवायसी आधार जोडणी केलेली नाही, त्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.
सुट्टीच्या दिवशीही महा ई सेवा केंद्र सुरु राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याचे जाहिर केले. त्याप्रमाणे दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये थेट जमा होऊ लागले. मात्र काही सधन शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत असताना जे शेतकरी आयटी रिटर्न दाखल करत आहे. अशा शेतकऱ्यांकडून जमा झालेले रक्कम वसूल करण्याबाबत स्पष्ट निर्देश महसूल विभागाला दिले.
तलाठ्यामार्फत प्राप्त गावनिहाय लाभार्थी यादीनुसार शेतकऱ्यांना नोटीसा पाठवल्या. नंतर काही शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे जमा रक्कम परत देऊन टाकली होती. मध्यतंरी दोन वर्षांचा करोना काळ लक्षात घेता मृत शेतकऱ्यांच्या बॅंकखात्यात या योजनेची रक्कम जमा होत असल्याचे समोर आले. अखेर लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वतःचे आधारकार्ड ई केवायसीला जोडणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
खेड तालुक्यात जवळपास 52 हजारहून जास्त शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे लाभ घेत आहे. यापैकी 25 हजार 387 लाभार्थी शेतकऱ्यांची ईकेवायसीला आधारकार्ड जोडणी केली नाही. ही जोडणी न केल्यास शेतकऱ्यांना या योजनेपासून पुढील काळात लाभ मिळणार नाही. लाभार्थी शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान योजनेला आपले आधारकार्ड जोडण्यासाठी स्वतः चा मोबाईल, अथवा कुटुंबातील मोबाईल, पॅनकार्ड, सोबत ठेवून ईकेवायसी करुन घ्यावी.
– सारंग कोडोलकर, प्रभारी प्रांताधिकारी