वृक्षतोड थांबेना; कोळशाची गोदामे ओव्हर फ्लो; वनविभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष
लाकडी कोळसा वखारींचे फुटले पेव
बोकाळलेल्या कोळसा माफियांना लगाम लावणार कोण?
रवींद्र कदम
नगर -पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी वृक्षलागवड मोहीम राबविण्यास सुरुवात करून, 3 वर्षांत 50 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. मात्र, नगर जिल्ह्यात सर्रास वृक्ष तोड करून अनधिकृत कोळसा माफियांचा गोरखधंदा सुरु असून, त्याकडे वनविभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कोळसा माफिया ही सुसाट सुटले असून कोळसा गोदामे ही ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे लाकडी कोळसा वखारींना पेव फुटले आहेत.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाकडी कोळसा माफिया सक्रिय असून, वृक्ष तोडीचा गोरखधंदा जोरात सुरु आहे. त्यापासून कोळसा बनवून अनधिकृत गोदाम भरले जात आहे. त्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले असून, त्यांच्यावर कुणाचेचे नियंत्रण राहिले नसल्याचे दिसत आहे. अनेक गावांतील डोंगरकडेच्या बाजूला वृक्षतोड करुन रात्रीच्या वेळी तोडलेली वृक्ष पेटवून दिले जाते. त्यापासून लाकडी कोळसा तयार करून, त्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे बोकाळलेल्या कोळसा माफियांना लगाम घालणार कोण? असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे.
दिवसेंदिवस होणाऱ्या जंगल तोडीमुळे मातीची धूप, वृक्षांची कामरता, पावसाचे कमी होत जाणारे प्रमाण, वृक्षअभावी येणारे पूर अशा समस्या जागोजागी भेडसावत असून, तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जमिनीवर पाण्याचे साठे आणि भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने कमी कमी होत चालली असून, पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे जिल्हातील वृक्षतोड थांबविण्यासाठी प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. जिल्ह्यात यंदा 1 कोटी 17 लाख 63 हजार 850 इतके वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायत विभागाला 41 लाख 99 हजार 700, वन विभागाला 41 लाख, समाजिक वनीकरण विभागाला 21 लाख आणि कृषी विभागाला 6 लाख 72 हजार, तर नगरविकास विभागाला 1 लाख 88 हजार 750 इतक्या रोपांचे उद्दिष्ट दिले होते. उर्वरित विभागांना मात्र लाखाच्या आत उद्दिष्ट देण्यात आली होती. याबाबत नुकतेच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात लावण्यात आलेल्या वृक्ष लागवाडीचे ऑडिट करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे. मात्र, वृक्षतोड झालेल्या जंगलाचे ही ऑडिट होणे गरजेचे असून त्यासाठी एक समिती स्थापन केली पाहिजे. क्रमशः…
कुंपणच शेत खातंय…
वन विभागाच्या दुर्लक्षामुळे कोळसा माफियांचा सुळसुळाट सुरु असून सर्रास वृक्ष तोड होत आहे. संबंधित वन विभागाचे अधिकारीच कोळसा माफियांना पाठबळ देत असून कुंपणच शेत खातंय असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तक्रार करायची तरी कुणाकडे असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.