मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याला भेट देत जिल्ह्यासाठी तात्काळ १०० कोटींची मदत जाहीर केली होती. दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देताना आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारतर्फे रायगड जिल्ह्याला देण्यात आलेली मदत तोकडी ठरेल असा दावा केला.
याबाबत बोलताना फडणवीस यांनी, “निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपयांची मदत तोकडी ठरेल या चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना राज्य सरकारने मोठी मदत करावी. तातडीने रोख रक्कम नागरिकांना मिळाली पाहिजे” अशी मागणी केली.
यावेळी बोलताना फडणवीस यांनी, राज्यात भाजपाचे सरकार असताना आपत्तीच्या प्रसंगात कसे निर्णय़ घेण्यात आले. नागरिकांना कशी जास्तीत जास्त मदत उपलब्ध करुन दिली याबाबतचे दाखले देखील दिले.
यावेळी मोदी सरकारच्या वर्षपुर्तीवर बोलताना त्यांनी, ‘मोदी सरकारने जे निर्णय अशक्यप्राय असल्याचं अनेकांना वाटत होते, ते निर्णय मोदी सरकारने घेतले. यामध्ये कलम ३७० रद्द करणे हा महत्वाचा निर्णय होता. सुधारित नागरिकत्व कायदा, राम मंदिर हे केंद्र सरकारचे चांगले निर्णय असल्याचे ते म्हणाले.