पेठ – येथील परिसरात आज (दि. 25) दुपारपासून वातावरणात ढगाळ झाल्याने व पाऊस पाडण्याइतपत वातावरणात अंधार झाल्याने लोकांनी अधिक धास्ती घेतली आहे.
सातगाव पठार भागात करोना या संसर्गजन्य आजाराची धास्ती घेऊन नागरिक आपापल्या घरांमध्ये बसलेले आहेत.गावातच काय पण वाड्या-वस्त्यांवर सर्व रस्ते ओस पडले आहेत. त्यातच आज दुपारपासून सातगाव पठार परिसरामध्ये वातावरण ढगाळ होण्यास सुरुवात झाली. असेच वातावरण साधारण दोन-तीन दिवसांपासून दुपारी बदलताना दिसून येत आहे. आकाशामध्ये ढग दाटून येत आहेत आणि सर्वत्र अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज (दि. 25) दुपारी चारच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू झाला आणि वारे वाहू लागले, त्याचबरोबर बारीक पावसालाही सुरुवात झाली आहे. अशा वातावरणामुळे लोकांच्या मनामध्ये भीती आणि संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मार्च महिन्यामध्ये हवामानानुसार कडक उन्हाळा जाणवायला पाहिजे.
लोकांना अपेक्षा आहे की कडक उन्हामुळे तापमान वाढल्यानंतर विषाणू टिकणार नाहीत; पण या अपेक्षेवर या अवकाळी पावसाने पाणी फिरताना कुठेतरी दिसून येत आहे. नागरिकांनी आपल्या घरातच थांबावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.