भाऊ ठाकूर
राहू – दोन वर्षांपासून करोनाने शाळा बंदच होत्या. परंतु पुन्हा शाळा बंद होण्याची वेळ आली आहे. पाचवीपासून पुढील वर्ग सुरू आहेत. पहिली ते चौथीपर्यंत वर्गाचे शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांच्यात समन्वय साधून सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाने दिले
आहेत. त्यामुळे दौंड तालुक्यात शिक्षणाची कासवगती सुरू आहे. सध्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचा बौध्दिक विकास खुंटला आहे. त्यामुळे भविष्यात मुलांवर दूरगामी परिणाम होणार आहेत.
करोनाची महामारी येऊन दोन वर्षे झाली आहेत. ज्या मुलांचे वय करोना येण्यापूर्वी शाळायोग्य होते. आज त्या मुलाचे वय तिसरीच्या वर्गाचे झाले आहे. मग अजून त्यांना आपण किती दिवस शाळेपासून दूर ठेवणार आहोत, अशी चिंता पालक व्यक्त करीत आहेत.
पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन असताना ओमीक्रोनचा रुग्ण सापडल्याने पुन्हा सुधारित आदेश निघाले. या शाळा पुन्हा बंद ठेवण्याबाबतचे आदेश काढण्यात आले. त्यामुळे
पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी झाले होते. दौंड तालुक्यात पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या समन्वयातून पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे दौंड तालुक्यात याला प्रतिसाद अल्प प्रमाणात मिळाला आहे. पालकांचे संमतीपत्रक घेऊन पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग कोविडचे नियम पाळून फक्त दोन ते तीन तास वर्ग घेतले जातात. जेवणाच्या वेळेपर्यंत विद्यार्थी थांबवले जातात. गर्दी न करता घरी सोडले जात आहेत.
मोबाइलवर कितीही शिक्षण घेतले तरी प्रत्यक्ष आणि ऑनलाइन यात फरक आहे.
त्यामुळे प्रत्यक्ष अध्यापनातून ग्रासपिंग पॉवर वाढते. परंतु शाळाच बंद ठेवाव्या लागत असल्याने लहान मुलांची बौद्धिक वाढ खुंटली आहे. पहिली ते चौथीच्या वर्गात शिक्षकच दिसून येत आहेत.
विद्यार्थी, विद्यार्थिनीच्या शिक्षणावर भविष्यात दूरगामी परिणाम होणार आहे. पुणे, मुंबई आदी मेट्रो सिटीत शाळांवर परिणाम झाला आहे. मात्र, विदर्भ व मराठवाढ्यातील अनेक जिल्ह्यांत पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरू झाल्या आहेत.
स्पर्धेच्या युगात दूरगामी परिणाम
गेल्या दोन वर्षांपासून करोनाची महामारी पाठ सोडेना, अशी अवस्था आहे. यात सर्वच घटक होरपळून गेले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शिक्षणांचा खेळखंडोबा झाला आहे. यात ऑनलाइनचा पॅटर्न रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक स्थितीचा अडसर या अभ्यासक्रमाला आला होता.
त्यावेळी ऑनलाइनची मात्रा रूजली नाही. गेल्या दोन वर्षांत मुलांची बौद्धिक वाढ बऱ्याच प्रमाणात खुंटली आहे. त्याचे दूरगामी परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणावर होणार आहे. तसेच स्पर्धेच्या युगात हे विद्यार्थी तग धरणार काय, अशी चिंता शिक्षण क्षेत्रातील जाणकारांमधून व्यक्त होत आहे.
ऑनलाइनच्या नावाखाली फी वसूल
परीक्षा न घेता ठराविक वर्ग सोडले तर बाकी वर्गातील सर्व विद्यार्थी हे एका ठराविक मूल्यमापनावर सर्व विद्यार्थी हे पुढील वर्गात घेण्यात आले. परंतु मराठी शाळेतील विद्यार्थी हे एक रुपयाही फी न देता पुढील वर्गात गेले.
परंतु खासगी शाळांनी मात्र ऑनलाइनच्या नावाखाली संपूर्ण वर्षाची फी वसूल केली आहे. त्यामुळे एकीकडे अध्यापनावर परिणाम, ढासळलेला दर्जा याची सांगड शाळा व्यवस्थापन कशी घालणार, असा प्रश्न आहे.
आत्ता फक्त दोन ते तीन तास पहिली ते चौथीपर्यंत वर्ग घेतले जातात. त्याचा कालावधी वाढणे गरजेचे आहे. परंतु कोविडचा पण विषय महत्वाचा आहे. परंतु एकंदर विद्यार्थ्यांची सुरक्षितता पाहून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळले पाहिजे.
– संदीप पांगारकर, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, टाकळी भीमा.