नगर -करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रभाग सुरक्षा समिती स्थापन केली आहे. या समितीत विद्यमान नगरसेवक व मनपाचे अधिकारी कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. ही समिती शहरात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहे असे, महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
सरकारने वैद्यकीय तपासणीनंतर अत्यावश्यक कारणासाठी बाहेरगावी जाण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे नगर शहरात परराज्य व परजिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून महापालिका त्यांना क्वारंटाईन’ करणार आहे.
महापालिका आयुक्तांनी प्रभागनिहाय सुरक्षा समिती स्थापन केली आहे. ऊसतोड कामगार, परराज्यांतील अथवा परजिल्ह्यांतील व्यक्ती, विद्यार्थी, पर्यटक, भाविक नगर शहरात येत आहेत. नगर शहर करोनामुक्त झाले असून, पुन्हा करोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी प्रभाग सुरक्षा समित्या स्थापन केल्या आहेत.
शहरात 17 प्रभाग असल्याने 17 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. समितीत संबंधित प्रभागाचे चारही नगरसेवक व महापालिकेकडून एक डॉक्टर व सात कर्मचारी नियुक्त केले आहेत. बाहेरून शहरात वास्तव्यास येणाऱ्या व्यक्तींना, प्रशासनाची परवानगी नसल्यास शहरात प्रवेश दिलाच जाणार नाही. तथापि, परवानगी असल्यास जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून संबंधित व्यक्तीच्या हातावर क्वारंटाईन’चा शिक्का मारून निश्चित केलेल्या ठिकाणी विलगीकरण केले जाणार आहे.
बाहेरून नगरमध्ये वास्तव्यास आलेल्याचे नाव व इतर माहिती समितीला ठेवावी लागेल. आरोग्य विभागातर्फे या व्यक्तींची तपासणी तत्काळ केली जाणार आहे.
बाहेरून येथे आलेल्या व्यक्तींना 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक असेल. तसेच, संबंधितांच्या हातांवर शिक्के मारण्यात येणार आहेत. तसे न केल्यास कारवाई केली जाणार आहे. सारी व करोनासदृश आजाराची लक्षणे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीची माहिती तत्काळ वैद्यकीय आरोग्य विभागास देण्यात येईल.