नवी दिल्ली : रेशन कार्डधारकांना सरकारने मोठा दिलासा दिलासादायक आहे. कारण केंद्र सरकारने रेशन कार्डसंबंधी एका नियमात बदल केला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा कोट्यवधी लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. रेशन कार्डाला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता सप्टेंबरपर्यंत रेशन कार्डाला आधार क्रमांकाला जोण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.
सोमवारी सरकारने यासंदर्भातील निर्णय जाहीर केला. तसेच आधार क्रमांक जोडला नसेल तरी रेशन कार्डधारकाला धान्य मिळत राहणार असल्याचेही सरकारने सांगितले. रेशन कार्डाला आधार क्रमांक न जोडल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येण्याच्या वृत्तावर स्पष्टीकरण देताना सरकारने ही माहिती दिली.
सरकारने आता आधार क्रमांक रेशन कार्डाला जोडण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. रेशन कार्डाशी आधार क्रमांक न जोडल्यास ते रद्द करण्यात येईल अशा चर्चा सुरू होत्या. अशा परिस्थितीत सरकारकडून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. अद्यापही कोट्यवधी लोकांनी आपला आधार कार्ड क्रमांक रेशन कार्डाला जोडलेला नाही. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या ७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या अधिसूचनेच्या आधारे सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना रेशनकार्ड आधार क्रमांकाशी जोडण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
जोपर्यंत सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना स्पष्ट सूचना देत नाही तोपर्यंत त्याच्या वाट्याचे रेशन सर्वांना द्यावे लागणार आहे. तसेच आधार क्रमांक नसल्यामुळे कोणाचेही रेशन कार्ड रद्द होणार नसल्याचे स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यातच गरीब कुटुंबांना कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून सरकारने तीन महिन्यांपर्यंत एकूण १५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला होता.