नगर – अवकाळी पावसाच्या जोरदार तडाख्यानंतर शनिवार (दि.13) रोजी 43 अंशांवर पोहचले असून नगरकरांना उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे नगर शहरासह जिल्ह्यात दुपारी जनजीवनावर परिणाम जाणवत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत कमाल तापमान वाढण्याचा अंदाज ही वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यता काही भागात अवकाळीचे ढग कायम असल्याने शनिवारी दुपारी शहरात काहीवेळ दमटपणा जाणवला. कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र घटल्यानंतर दोन दिवसांनी उकाड्यात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्याअखेरीस शहरासह जिल्ह्याचे तापमान 44 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कमाल तापमान 25 अंश सेल्सियस असल्याने पहाटेपासून काहीसा उकाडा नगरकरांना जाणवत आहे. जिल्ह्यातही उन्हाचा तडाखा वाढत आहे. नगरमधील कमाल तापमान 43 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा चांगलाच घाम फोडणार आहे.
उष्माघातासाठी कक्ष
उष्माघाताच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात बेडसह स्वतंत्र खोली सज्ज ठेवा, असे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांत प्रत्येकी दोन, तर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी एक बेड राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.