पुणे – संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने शहरात दर गुरुवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, दुसऱ्या बाजूला पालिकेच्याच कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे दिसून येत आहे.
प्राणीसंग्रहालयाच्या मुख्य द्वारापासून प्रवेश केल्यानंतर पर्यटक आधी सर्पोद्यानाकडे वळतात. तेथून येताच पाणपोई आहे. तेथून समोरच्या बाजूने एक ओटा आहे. त्याखाली असलेल्या व्हॉल्वला अनेक दिवसांपासून गळती असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, उद्यानाचे मुख्य कार्यालय येथून जवळच आहे. तेथे मनपा अधिकाऱ्यांचा राबता असतो. तर, झाडांना पाणी देण्यासाठी असलेले कर्मचारीदेखील या व्हॉल्वजवळून फिरत असतात. पण, सातत्याने सुरू असलेली ही पाणीगळती रोखण्यासाठी कोणीही पुढाकार घेतलेला नाही. कहर म्हणजे, कोणीतरी कर्मचाऱ्याने ही गळती रोखण्यासाठी प्लॅस्टिक पिशवी गुंडाळली आहे. त्यातून सतत कारंजे उडत असतात. उद्यानात येणाऱ्या बच्चेकंपनीला याची मजा वाटते. तेदेखील पाण्यात खेळण्याचा आनंद मिळवतात.
पण, ऐन टंचाईचा काळात ही पाण्याची नासाडी न परवडणारी आहे. या पाणीबचतीबाबत पालिका गंभीर असल्याचे दाखवत आहे. पण, कात्रज उद्यानात मात्र परिस्थिती नेमकी उलट असल्याचे चित्र आहे.