मेहकरीच्या ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या
रफिक शेख
नारायणडोहो – तलाठी सजा कार्यालय केवळ बुजगावणाप्रमाणे उभे आहे. कामासाठी आल्यानंतर येथे केवळ कार्यालयाचा फलक दिसतो. मात्र, कधी जा कार्यालय बंदच राहत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रशासनाने त्याची दखल घेत मेहकरी गावात तातडीने कायमस्वरूपी तलाठी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
नगर तालुक्यातील मेहकरी या गावासह बारदारी, सोनेवाडी, पिंपळगाव लांडगा आदी वाड्या वस्ती या सजांच्या परिसरातील ग्रामस्थांना सातबारासह जमिनीचा दाखला काढणे, वाटणी पत्रक करणे, हक्कसोड करणे, फेरफार नक्कल, बोजा चढविणे व उतरविणे, निराधार योजना, दिव्यांग योजना, उत्पन्नाचा दाखला आदी कामे, तलाठी सजामध्ये येत नसल्यामुळे खोळंबली आहेत.
आठवडयातून एखादा दिवस तलाठी हजर होतात. तेव्हाही लाईट नसल्याचे कारण सांगून ग्रामस्थांची कामे टाळली जातात. त्यामुळे ग्रामस्थांना आपल्या कामांसाठी तालुकापातळीवर चकरा माराव्या लागत आहेत.
10 ते 12 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे शेतकऱ्यांना आपली शेतातील कामे सोडून तर मोलमजुरी करणाऱ्यांना रोजंदारीची कामे सोडून तालुक्याला चकरा माराव्या लागत असल्याने दुहेरी भुर्दंड सहन करावा लागतो.