रांजणी – आंबेगाव तालुक्यात चालू खरिपात कमी पर्जन्यमान झाले . त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा कमी पाण्यावरील रब्बी हरभरा, ज्वारी, गहू अशा पिकांवर भर देण्याची शक्यता आहे. सध्या वाढत असलेली ऑक्टोबर हिट, विहिरीत कमी असलेला पाणीसाठा आणि जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा हरभरा आणि गहू पेरणीकडे कल आहे. त्या दृष्टीने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.
आंबेगाव तालुक्यात रब्बीचे एकूण सहा ते सात हजार हेक्टर क्षेत्र आहे. चालू वर्षी खरिपात झालेल्या कमी पावसामुळे रब्बीच्या पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. कृषी विभागाने सुमारे दोन हजार हेक्टरवर तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीचा दावा केला आहे. मान्सून हंगामात सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याला चांगला आधार मिळाला. त्यातच कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या डिंभे धरणात पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध झाले आहे त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना देण्यात येणाऱ्या पाण्याच्या आवर्तनाचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे.
तालुक्यात सरासरीच्या 76.2 टक्के पाऊस पडला आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली, त्यामुळे रब्बीच्या शेती कामांना आता सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी ज्वारीच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे तर लवकरच शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांच्या पेरण्यांना सुरुवात करतील.
“आमच्याकडे 25 एकर पेक्षा अधिक शेती आहे. ही सर्व जमीन डिंभे धरणाच्या अंतर्गत येते. त्यामुळे बऱ्यापैकी शेती बागायती आहे. यंदा कमी पावसामुळे धरणात पाणीसाठा असला तरी आवर्तन वेळेवर येईल की नाही याबाबत आम्ही साशंक आहोत, त्यामुळे पाणीटंचाईची शक्यता असल्याने ठिबक सिंचनाचा अवलंब करणार आहोत याशिवाय कमी कालावधीच्या पिकांवर आणि भाजीपाला पिकांवर भर देणार आहोत.” – महादेव भोर, प्रगतशील शेतकरी, वळती
खरीप काही अंशी वाया
रब्बीत शेतकऱ्यांनी सोसायटीचे पीक कर्ज घेऊन पिकांचे नियोजन केले आहे; परंतु पुरेसा पाऊस न पडल्याने खरीप काही अंशी वाया गेला. तालुक्यात अजूनही दमदार पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. रब्बी हंगाम अडचणीचा जाण्याची शेतकऱ्यांना शक्यता वाटत आहे. रब्बी हंगामात गव्हाचा पेरा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो त्यासाठी बियाणांची मागणी मोठी आहे. गाव पातळीवर कृषी सेवा केंद्रामार्फत निविष्ठांचा पुरवठा केला जाणार आहे.