संगमनेर – तालुक्यातील खांडगाव येथील तलाठ्याने बोगस पीक पाहणीची नोंद केली आणि काही लोकांना हाताशी धरून शेवगा पिकाची पीक पाहणी लावली, अशा आशयाच्या वृत्त प्रसारित झाले होते. याचे कात्रण सामाजिक माध्यमामध्ये जाणीवपूर्वक उपसरपंच यांनी फिरवल्याने तलाठी यांची बदनामी झाली. याबाबत त्यांनी चौघांविरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगात तक्रार दिली आहे.
खांडगाच्या तलाठी योगिता शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महाराष्ट्र शासन परिपत्रकाप्रमाणे पिकाची नोंद ही स्वतः शेतकरी करत आहेत. शासनाने ई-पिक पाहणी हे अॅप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. प्रत्येक शेतकरी हा आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतः ई-पिकपाहणी अॅपद्वारे करतात. या सर्व प्रोसेसमध्ये तलाठी हे पिकांची नोंद करीत नाहीत अगर पिकांची नोंद होणेसाठी कोणतीही भूमिका पार पाडत नाही. बातमीमध्ये योगिता शिंदे यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यांनी त्या पिकांची नोंद केलेली नसून संगमनेर खुर्दचे उपसरपंच गणेश साहेबराव शिंदे यांनी व्हॉटस्अप ग्रुपला व सोशल मिडीयावर व्हायरल करुन सामाजिक प्रतिष्ठा आणि सचोटी व सामाजिक प्रतिमा मलीन करण्याचे काम केले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
चुकीच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळे तलाठी शिंदे यांच्यावर चुकीचे दोषारोप केले आहे. यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडले असून. संगमनेर खुर्दचे उपसरपंच गणेश साहेबराव शिंदे यांचे विरोधात तलाठी यांनी यापूर्वी सरकारी कामात हरकत अडथळा निर्माण केला म्हणून यापूर्वी केस केलेली आहे, ही केस मागे घ्यावी व त्याची निदोष मुक्तता व्हावी, हा दृष्ट हेतू मनात ठेऊन, तलाठ्यावर दबाव आणून उपसरपंच गणेश शिंदे हे मुद्दामहून जाणीवपूर्वक बदनामी होईल, असे कृत्य नेहमी करीत आलेला आहे.
त्यामुळे या सर्व प्रकारात संबंधीत व्यक्ती अनिल भारत बालोडे, भारत दादा बालोडे, अरुण दादा बालोडे, सचिन अरुण बालोडे व संगमनेर खुर्दचे उपसरपंच गणेश साहेबराव शिंदे या सर्वांवर बदनामी करणे, खोट्या बातम्या प्रसारीत करणे, मान सन्मानाला ठेच पोहचेल असे कृत्य करणे, वक्तव्य करणे यासाठी आयपीसी कलम ४९९ व ५०० ची तरतूद या सर्व व्यक्तींना लागू व्हावी, अशी विनंती योगिता शिंदे यांनी राज्य महिला आयोगात दिलेल्या तक्रारीत केली आहे.