नगर – स्टेट बँक चौक ते चांदबीबी महालापर्यंतच्या रस्त्यावर एका महिण्यात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या महामार्गाची दुरावस्था झाल्याने हे अपघात झाले आहे. शुक्रवार (दि.२) रोजी सकाळी दुचाकीस्वार माजी सरपंच सुनील विजयकुमार बेरड यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी यांची भेट घेत येत्या ८ दिवसात या रस्त्यावरील खड्डे बुजवावे अन्यथा स्टेट बँक चौकात शनिवार (दि.१०) रोजी ग्रामस्थ व भिंगर मधील नागरिक यांच्याश तीव्र रस्तारोको आंदोलन केले जाईल, असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी दिला.
स्टेट बँक चौक ते चांदबीबी महालापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी आ. संग्राम जगताप व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेतली. या वेळी राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता तारडे, कृष्णा बेरड, सुधीर लांडगे, गजानन भांडवलकर, संतोष भालसिंग, गोविंद काळे, वैभव गुंड, अमोल गायकवाड, ऋषिकेश खामकर, ओंकार बेरड, सुनील देवकर, सोपान दांगडे, शरद दारकुंडे, सतिश बेरड, संतोष बेरड, प्रशांत बेरड, अशोक चव्हाण, भाऊसाहेब बेरड, हनुमंत घोलप, मारुती गाडेकर, भानुदास नाटक, अशोक बेरड, विष्णू बेरड, राम बेरड, आदीसह शहापूर ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
कल्याण राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजूर झाले होते, मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम पूर्ण होवू शकले नाही. त्यामुळे नेप्ती बायपास चौक ते नेप्ती नाका आणि स्टेट बँक चौक चांदबीबी महालापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग हा गेल्या ३ वर्षापासून खड्डेमय झाला आहे. नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्यावर सातत्याने छोटे मोठे अपघात होवून काही जन जखमी झालेत तर अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
जिल्हाधिकारी झाले भावूक
जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता तारडे यांना बोलावून घेत संबंधित रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावे, असे आदेश दिले. तसेच अपघातात नागरिकांचा नाहक बळी जात असून या वेळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांना मोबाईल द्वारे घडलेल्या अपघाताचे दृश्य दाखवले तेव्हा जिल्हाधिकारी व आमदार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.