नगर – नगर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी पळविले. त्यांनी आतापर्यंत येथील शेतकऱ्यांवर अन्यायच केला आहे. त्यामुळे आता जलसंपदा खात्यावर असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेसची मक्तेदारी काढून नगरकरांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देणार, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर चौफेर टीका केली. नगरकरांच्या हक्काचे पाणी पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पळविले, असा आरोप त्यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणूक प्रचारावेळी नगर तालुक्यातील वाळकी येथे रखडलेली साकळाई योजना मागणी मार्गी लावण्याचा शब्द दिला होता. नंतर विधानसभा निवडणुका होऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. गेल्या अडीच वर्षात कुकडी प्रकल्पामध्ये साकळाई योजनेसाठी पाणी शिल्लक नव्हते.
परंतु, महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या उंबरठ्यावर असताना 28 जून 2022 रोजी कुकडी प्रकल्पात 4.94 टीएमसी पाणी शिल्लक असल्याचे अहवालात दाखविले. अहवालात दाखविलेले उपलब्ध तीन टीएमसी पाणी पुणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तातडीने पळविण्याचा घाट घातला होता. परंतु, तो आम्ही हाणून पाडला.
उपलब्ध असलेले तीन टीएमसी पाणी साकळाई योजनेसाठी देण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यांनीही लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द पाळण्यासाठी साकळाई योजनेच्या सर्व्हेक्षणास तातडीने मंजुरी दिली. साकळाई योजना पूर्ण करण्यासाठी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे खासदार विखे यांनी यावेळी सांगितले.