अभिनेता देवानंद यांच्या 26 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या जन्मशताब्दी निमित्त… पाच दशके सिनेपडद्यावर आपले अस्तित्व राखणारे, चॉकलेट हिरो म्हणून तरुणांच्या (खासकरून तरुणींचा) आवडत्या देवानंदची जन्मशताब्दी नुकतीच सुरू झाली. धर्मदेव हे त्यांचे मूळ नाव. देवानंदांचे वडील पिशोरीमल हे व्यवसायाने वकील पण अशोक कुमारने प्रभावित असलेल्या देवानंद यांनी अभिनय क्षेत्रात नशिब आजमविण्याचे ठरविले आणि घर सोडत मुंबई गाठली.
मुंबईत उपजीविकेसाठी लष्कराच्या टपाल खात्यात काम स्वीकारले आणि भाऊ चेतनच्या सांगण्यावरून इप्टातही प्रवेश घेतला. पुढ़े त्यांचा परिचय बाबूराव पै यांच्याबरोबर झाला. त्यांनी देव यांना पुण्यात प्रभातमध्ये जाण्याचा सल्ला दिला. प्रभातमध्ये त्यांची “हम एक है’ या सिनेमासाठी निवड झाली. हा सिनेमा अपेक्षित यश देऊ शकला नाहीय पण या निमित्ताने गुरुदत्त बरोबरचे मैत्र आकारास आले, पुढ़े कामिनी कौशल बरोबरचा ‘जिद्दी’ सिनेमा हिट ठरला आणि देव यांच्या पंखांना बळ मिळाले.
याच दरम्यान अभिनेत्री सुरैय्या आणि देवानंद यांचे सूत जमले. ‘विद्या’ सिनेमात नावेतल्या एका दृश्याच्या चित्रीकरणाच्या वेळी सुरैय्या यांचा तोल जात त्या पाण्यात पडली. देव यांनी त्यांना तत्परतेने वाचविले. या प्रसंगामुळे सुरैय्या देव यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या. या प्रेमासंबंधाला सुरैय्याच्या आज्जीचा प्रखर विरोध होता. तुमच्या लग्नामुळे हिंदू मुस्लीम समाजात तेढ पडून दंगली होतील अशी भीती दाखवत तिने त्यांच्यात ताटातूट घडवून आणली.
सुरैय्या पुढे आजन्म अविवाहित राहिली. देवानंदनेही आपली वाट बदलणे श्रेयस्कर समजले. त्यांनी स्थापन केलेल्या नवकेतन फिल्म्सकडे लक्ष देणेही गरजेचे होते. त्यांनी ‘बाजी’ सिनेमाची सुरुवात केली. याचे दिग्दर्शन गुरुदत्त यांना देत त्यांनी दिलेल्या शब्दाचा ‘बाज’ राखला.
‘बाजी’ हिट ठरला. याच काळी देव, मोना सिन्हा अर्थात कल्पना कार्तिकच्या प्रेमात पडले. हे देवचे दुसरे प्रेम, “टॅक्सी ड्रायव्हर’ सिनेमाच्या सेटवर दोघांचे लग्न झाले.
त्यांचा ‘आंधियॉं’ हा सिनेमा कार्लोव्ही वेरी फेस्टिव्हलसाठी निवडला गेलेला पहिला भारतीय सिनेमा ठरला. आंधियॉंच्या दरम्यानच त्यांचे चेतन आनंद बरोबर मतभेद झाले. परिणामी चेतन यांनी वेगळी चूल मांडली. देव यांच्या संवादफेक, रोमॅंटिक अदा, इत्यादींनी मुली वेड्या होत. त्यांच्या याच लोभसपणामुळे “कालापानी’ सिनेमानंतर त्यार्रीज्ञ काळा कोट घालण्यास बंदी करण्यात आली होती, असे सांगितले जाते. मुनीमजी, सी आई डी, नौ दो ग्यारह, पेइंग गेस्ट, असली नक़ली, काला बाजार, तीन देवियॉं आदी सिनेमांनी चौफेर यश मिळविले.
दरम्यान आर. के. नारायण यांची कादंबरी ‘द गाइड’ देवच्या पाहण्यात आली. यावर सिनेमा बनवायच्या विचाराने ते झपाटून गेले. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत हा सिनेमा बनविला गेला. इंग्रजी आवृत्तीसाठी अमेरिकन लेखिका पर्ल एस बकची मदत घेण्यात आली. ‘गाइड’ सुपरहिट ठरला. सिनेमाला अनेक पारितोषिके मिळाली.
सिनेमाच्या श्रेयवादा वरून गैरसमज होत, लेखक आर. के. नारायण यांच्याबरोबरही देव यांचे मतभेदही झाले. इंग्रजी ‘गाइड’ ला मात्र मर्यादितच यश मिळाले. आश्चर्य वाटेल पण मुख्य नायिका असलेली रोजी अर्थात वहिदा रेहमान देवशी असलेल्या बेबनावामुळे हा सिनेमा करण्यास तयार नव्हती; त्या जागी वैजयंती माला किंवा लिला नायडूंना घेण्याचा विचार होता पण राज खोसलांनी समेट घडवून आणला. त्यानंतरच्या ज्वेल थीफनेही त्याच्या मुकुटात मानाचा तुरा खोचला. दोन पावलं पुढं जात देवानंदनी ‘प्रेमपुजारी’चे दिग्दर्शन केले, त्यांच्या या प्रयोगाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली, पण ही कसर ‘जॉनी मेरा नाम’ ने भरून काढली.
सिनेमाद्वारे सामाजिक संदेश पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील देवच्या, ‘हरे राम हरे कृष्ण’ सिनेमाला मोठा प्रेक्षक लाभला. यावेळी देव जीनत अमानच्या प्रेमात पडला, राज कपूर ही जीनतकडे आकर्षित होते. यावरून दोघांचेही जोरदार वाजले. वय वाढत असले तरी नायक म्हणून ‘शरीफ बदमाश’, ‘इश्क इश्क इश्क’, ‘अमीर गरीब’, ‘वारंट’, देस परदेस’, मनपसंद, लूटमार असे त्यांचे अनेक सिनेमे ओळीने येत होते; त्यांच्या ‘इश्क इश्क इश्क’ मध्ये बालकलाकार असलेल्या पद्मिनी कोल्हापुरेला ‘स्वामी दादा’मध्ये नायिका घेत त्यांनी सिनेमा बनविला; पण जरठ कुमारीची ही जोडी प्रेक्षकांना रुचली नाही.
दर्शकाची चव बदलत होती. नट म्हणून स्वीकारणारी मंडळी दिग्दर्शक म्हणून त्यांचा स्वीकार करताना दिसत नव्हती; पण देवानंद यांना हे उमगत नसावे. ते त्याच ज़ोमाने सिनेमे बनवत राहिले.
आपला मुलगा सुनील आनंदला सिनेसृष्टीत स्थापित करण्यासाठीही त्यांनी सिनेमे बनविले; पण तेही आपटले. सेंसरबोर्डाशी कायम वाकडं असणाऱ्या देव यांनी ‘सेंसर’ नावाने सिनेमा आणत चित्रपट निर्मात्यांची कैफियत मांडली. हम नौजवान, सच्चे का बोलबाला, लष्कर, अव्वल नंबर, सौ करोड, मैं सोलह बरस की, प्यार का तराना, गॅंगस्टर, लव ऍट टाइम स्क्वेअर, चार्जशीट असे अनेक सिनेमे केले; पण या साऱ्यां सिनेमांनी तिकिट खिडकीवर मान टाकली. पण देव काही विचलित झाले नाही. या धावपळीतही त्यांनी, ब्लॅक अँड व्हाइट ‘हम दोनों’ रंगीत करून आणला.
दिग्दर्शक राज खोसला, गीतकार नीरज, साहिर लुधियानवी, संगीतकार जयदेव, तसेच टीना मुनीम, जरीना वहाब, जॅकी श्रॉफ, तब्बू, आमीर खान, सोनम इत्यादी अनेक कलावंतांना देवानंद यांनी सिनेसृष्टीत आणले. “जंगली’, “तिसरी मंजिल’, ‘जंजीर’ सारखे काही सिनेमे सोडल्याची खंतही राहिली. तत्कालीन राजकारणावर रोष प्रकट करत देवानंद यांनी एकोणीसशे सत्याहत्तर साली ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ नावाने पक्षही काढला होता. पण त्याचाही गाशा गुंडाळला गेला.
भारत पाक दरम्यान सामंजस्य वाढावं, म्हणून सुरू केल्या गेलेल्या ‘सदा-ए-सरहद’ या बस सेवेच्या उद्घाटन फेरीत पंतप्रधान वाजपेयींबरोबर देवही होते.
पुरस्कारांची रास मिळालेल्या देव यांना भारत सरकारने पद्म भूषण तसेच दादासाहेब फाळके पुरस्कार देत गौरवान्वित केले. टपाल खात्याने त्यांच्या स्मरणार्थ तिकीटही काढले. पुण्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. डेक्कन येथील “लकी हॉटेल’ हे त्यांचे आवडते ठिकाण होते.
“अलीं ुळींहर्रूीीे शपींळीश लेवू,र्रूीीे लेवू,र्रूीीे ीेंशी,र्रूीीे षळपसशीी ीर्हीेश्रव लश ळर्पीेंर्श्रींशव रीर्रूीीेर् ीेंळलश ।र्रूीीे षरलश’, असा कानमंत्र देणाऱ्या चिरतरुण देवानंद यांचा शेवटचा ‘चार्जशीट’ हा सिनेमा त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला. वयाच्या अठ्याऐंशीव्या वर्षी लंडन येथे त्यांचे निधन झाले.
सत्येंद्र राठी